हडसर किल्ल्याची माहिती
Hadsar Fort information in Marathi
• स्थान:
महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतात पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात किल्ले हडसर आहे.
• उंची :
समुद्र सपाटी पासून हडसर किल्ला ४६८० फूट उंचीवर आहे.
• हडसर किल्ल्याकडे जाण्यासाठी प्रवाशी मार्ग:
• मुंबईहून ठाणे पुढे कल्याण मार्गे माळशेज घाटातून पुढे खुबी व पारगाव तर्फ मढ मार्गे आपण हडसरला जाऊ शकतो.
• पुणे मार्गे येताना चाकण मार्गे राजगुरू नगर तेथून पुढे मंचर नारायणगाव मार्गे पुढे जुन्नर तेथून पुढे माळशेज घाटाच्या रोडला असणाऱ्या पिंपळगाव सिद्धनाथ मार्गे हडसर किल्ल्याकडे जाता येते.
• पुणे ते हडसर हे अंतर १०५किलोमीटर आहे.
• मुंबई पासून हडसर किल्ला १५५ किलोमीटर आहे.
• छत्रपती शिवराय यांच्या जन्मभूमी शिवनेरी पासून हडसर किल्ला हा १५ किलोमीटर अंतरावर आहे.
• हडसरला जाताना आपण जुन्नरहून निमगाव, राजूर किंवा केवाड बसने आपण प्रथम हडसर गावी येऊन नंतर पुढे हडसर किल्ल्यावर जाऊ शकतो.
• हडसर किल्ल्याकडे जाण्याचा स्थानिक मार्ग :
• हडसर गावी गेल्यावर तेथून कच्च्या पायवाटेने आपण रानातून पायरी मार्गानें महादरवाजा तेथून सरळ किल्ल्यावर जाऊ शकतो.
• दुसरा मार्ग : हडसर गावातून रान वाटेने खिंडीतून किल्ल्याच्या तटबंदी कडील गिर्यारोहक मार्गाने किल्ल्याच्या (खुंटीच्या) वाटेने आपण हडसर किल्यावर जाऊ शकतो. पण ही वाट अत्यंत धोकादायक आहे.
![]() |
खुंटीचा मार्ग |
• हडसर किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:
छत्रपती शिवरायांसारखे नररत्न जन्मलेल्या शिवनेरी जवळील जुन्नर शहरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर हडसर आहे. प्रथम गावात प्रवेश केल्यावर गाडी पार्क करून गडवाटेची चौकशी करुन आपण गडाकडे मार्गस्थ होतो. रानवाटेने पुढे टेक चढून आल्यावर हिरव्या गर्द झाडीतून आपण डोंगर वाटेकडे येतो. तेथील विहिरीपासून आपणं पुढे रानातून खिंडीकडे जातो. तेथून पुढे डोंगराला वळसा घालून आपण गडाच्या पायरी वाटेजवळ येतो. ही वाट सुलभ व सोपी आहे. या पायऱ्या डोंगरातील कठीण कात्याळ खोदून तयार केलेली आहे. या मार्गाने आपण गडाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो.
• प्रवेशद्वार:
गडाच्या प्रवेशद्वारापाशी आपणास गोमुख रचना दिसून येथे. याचा अर्थ गाय आपले अंग चाटताना किंवा वासराला दूध पाजताना वळलेले मुख तशी रचना,याचा फायदा शत्रू दरवाजावर थेट हल्ला करू शकत नाही. तसेच हत्तीची धडक किंवा उंट यांचा मारा ही वेगात होऊ शकत नाही. व् दरवाजा सुरक्षित राहतो.
या दरवाजाचे बारकाईने निरीक्षण केल्यावर असे दिसून येते की संपूर्ण खड्या कात्याळात हा दरवाजा खोदून तयार केलेला आहे. संपूर्ण बाजूची तटबंदी ही तासीव कड्याची असून अपवादात्मक काही ठिकाणी बांधकाम केलेले पाहायला मिळतें. नाहीतर संपूर्ण चौकट ताशीव दगडाची आहे. या ठिकाणी हल्ली दरवाजा बसवलेला दिसून येतो. हा दरवाजा गडसंवर्धन करणाऱ्या शिवप्रतिष्ठान या संघटनेने शिवकालीन दाराची रचना करून बसवलेला आहे.
या दरवाजातून आतील भागात गेल्यास आपणास शिवकालीन सैनिकांना राहण्यासाठी देवड्या खोदून तयार केलेल्या दिसून येतात.खोदून केल्यामुळे आजही त्या सुस्थितीत आहेत.याच्या आतील विस्तृत दालने पाहून याची भव्यता दिसून येते. पहारेकरी तसेच शिबंदीतील बहूसंख्य मावळे राहू शकतील अशी त्यांची रचना विस्तृत आहे.
• किल्याच्या वरील भागात पाहण्यासारखी ठिकाणे:
• दुसरा महादरवाजा :
गडाच्या पहिल्या दरवाजातून आतमध्ये गेल्यावर आपणास दुसरे द्वार लागते. या ठिकाणी देखील गोमुख रचना दिसून येते. या ठिकाणी येताना प्रथम दरवाजातून आत मध्ये आल्यावर खोदीव पायरी मार्ग लागतो. या वाटेने पुढे आल्यावर दोन मार्ग दिसतात. एक वरील टेकाकडे जातो. तर दुसरा दुसऱ्या दरवाजाकडे जातो. हा देखील दरवाजा पहिल्या महादरवाजा प्रमाणे आहे. याची रचना देखील दगडी भाग खडकाचा खोदून तयार केलेली आहे. व् आतील बाजूस देवड्या देखील खोदलेल्या आहेत. हे कार्य करण्यासाठी खूप कालावधी लागला असावा. फक्त छिन्नी हातोडा वापरून हे कार्य त्या काळात केले गेले आहे. त्यांच्या खुणा इथे स्पष्ट दिसतात.
• पाण्याचे तळे:
गडावर आपणास खोदीव पाण्याचे तळे लागते. याच्या सभोवती चौथरा बांधलेला दिसून येतो. या तळ्याशेजारी आपणास दगडांचा ढीग पाहायला मिळतो. सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ज्यांना गड किल्ले यांविषयी आत्मीयता दिसून येते. त्यांनी या तलावाची स्वच्छता केली. आतील गाळ व दगड काढण्याचे काम त्यांनी केले. त्यावेळी तळ्यात सापडलेल्या तोफा त्यांनी या परिसरात ठेवल्याचे दिसून येते.
• गडावरील पाण्याची टाकी:
• जागोजागी गडावर बांधकाम करताना गडावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा उतार पाहून उताराच्या सखल भागात लहान मोठ्या आकाराची टाकी खोदली आहेत. ज्यातून निघालेले दगड हे गडाच्या तटबंदी व बुरुज बांधण्यासाठी तसेच इतर बांधकाम करण्यासाठी वापरले गेले. ती पाण्याची टाकी पाहायला मिळतात.
• पुष्करणी :
हिंदू धार्मिक विचार सरणी नुसार देव पूजेसाठी तसेच स्नानसंध्या करण्यासाठी बांधलेला तलाव म्हणजे पुष्करणी होय. असाच एक तलाव देखील या किल्यावर पाहता येतो.आजकाल याची बरीचशी मोडतोड झालेली आहे.
• पाणी भांडे :
गडावर तलावा शेजारी आपणास एक अष्टकोनी दगडी भांडे खोदून तयार केल्याचे दिसून येते. याचा वापर घोड्यांना पाणी पाजण्यासाठी होत असावा. याच्या मध्यभागीं छिद्र आहे. जे धुण्यासाठी केले असावे.
• खोदीव धान्य कोठार :
गडाच्या वरील भागात आपणास खोदीव धान्य कोठार पाहायला मिळते. गडाच्या वरील बाजूस कात्याळ खोदून गोमुख रचना पद्धतीने प्रवेश यंत्रणा केलेली दिसते. आतील बाजूस विस्तृत आवार पाहायला मिळतो. व तीन बाजूस तीन खोदिव खोल्यांची रचना केलेली पाहायला मिळतें.या खोल्यांच्या आत अनेक दालने आहेत. तसेच पोट खोल्या देखील बनवल्या आहेत. ज्यांचा वापर किल्ल्यावरील धान्यसाठा तसेच शिबंदितील सैन्य राहण्यासाठी केली गेल्याचे दिसते.
यांची रचना करताना पावसाचे पाणी आत येऊ नये, तसेच नीचरुन जावे यासाठी योग्य ती काळजी घेतली आहे. वाटेच्या बाजूने चर खोदून पाणी जाण्यासाठी मार्ग बनवला गेला आहे..
• शिव मंदिर:
गडावर आपणास एक शिव मंदिर बांधलेले पाहायला मिळते. संपूर्ण चिरेबंदी बांधकाम या मंदिराचे आहे. वरील बाजूस घुमटाकार कळस आहे. व आत महादेव पिंड आहे. गरुड तसेच हनुमंत, गणपती या संकट नाशन देवतांच्या पाषाण मुर्ती देखील शेंदूर लावून पुजलेल्या पाहायला मिळतात.
बाहेरील चौकटी खाली एक राक्षसी चेहरा असणारे शिल्प पाहायला मिळते जे एका दैत्याचे आहे. त्यास कीर्तीमुख म्हणतात. त्या दैत्याबाबत अख्यायिका प्रचलित आहेत. की त्यास खूप भूक लागत असे. व काहीही खाल्ल तरी त्यास समाधान मिळत नसे. तेव्हा त्याने शिव आराधना केली. शिव शंकर प्रकट झाले , त्याने आपली भूक शमविण्यासाठी उपाय विचारला. तेव्हा शंकर भगवान म्हणाले की तू स्वतः ला पायापासून खायला सुरुवात कर. तेव्हा त्याने आपले सर्व शरीर मुंडके सोडून खावून टाकले. तरी देखील त्याची भूक शमत नव्हती. तेव्हा शंकराने त्यास आपल्या मंदिराच्या उंबर्यावर स्थान दिले. व त्यास आपल्या भक्तांची पापे खाण्यास सांगितले. अशा प्रकारे त्यांनी त्या दैत्याच्या समस्येचे निवारण केले. त्याचे हे शिल्प प्रतीक आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात शीतलता जाणवते.
• देवी मंदिर:
गडाच्या एका बाजूस आपणास एक मंदिर पाहायला मिळतें. ज्याच्या आतील बाजुस भग्न अवस्थेत मूर्ती पाहायला मिळते. जी हिंदू देवतेची असल्याचे दिसून येते. मंदिर सुस्थितीत असले. तरी आतील गाभार्यातील मूर्ती समाज कंटकांनी भंग केल्याचे जाणवते. परचक्र आल्यावर हे अमानवी कृत्य केले गेल्याचे जाणवते. ही या गडाची देवता असल्याचे जाणवते.
• वाड्याचे अवशेष :
आपणास गडावर एका ठिकाणीं वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. आजही याचे चौथरे शिल्लक आहेत. व् थोडे बांधकामही.
• हनुमंत मंदिर :
खूंटीच्या वाटेने आपण गडावर आल्यावर भग्न वास्तू पाहायला मिळते. ते एक हनुमंत मंदिर आहे. ज्याच्या पायाचे व ज्योत्याचे अवशेष शिल्लक असून हनुमंताची शेंदरी मूर्ती पाहायला मिळते.
• गुहा खोल्या व पाण्याच्या टाक्या:
खुंटीचे वाटेने आपण गडावर येताना आपल्याला गडाच्या चढाई करताना खडकात खोदून केलेल्या खोल्या पाहायला मिळतात.
वरील बाजूस आपणास आणखी खोल्या व भुमिगत दालने खोदलेली पाहायला मिळतात.
• तटबंदी व बुरुज:
खुंटी वाटेने आल्यावर आपणास गडाची मोठी उंच तटबंदी पाहायला मिळते. तसेच कमकुवत जागी बांधलेले बुरूज देखील पाहायला मिळतात. ज्यांची काही प्रमाणात झिज झालेली पाहायला मिळतें.
![]() |
खुंटीच्या वाटेने दिसणारे दृश्य |
• हडसर किल्ला हा जुन्नर परिसरातील महत्त्वाचा किल्ला आहे. या किल्ल्यावरून माणिकडोह जलाशयाचा परिसर, चावंड किल्ला, जीवधन किल्ला, शिवनेरी किल्ला, भैरवगड,नाणेघाट यांचे दर्शन होते.
• हडसर किल्याविषयी ऐतिहासिक माहिती :
• हडसर किल्ला हा नाणेघाट मार्गे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर देखरेख करण्यासाठी बांधला गेला होता.
• या किल्याची निर्मिती सातवाहन काळात केली गेली होती.
• त्यानंतर हा किल्ला शक राजे, यादव, प्रतीहार अशा अनेक राजवटी मध्ये होता.
• पुढे मुस्लिम राजवटीत बहामनी सुलतानाच्या ताब्यात हा किल्ला होता.
• बहामनी राजवट नष्ट झाल्यावर या किल्यावर अहमदनगरच्या निजामशहाची सत्ता होती.
• निजामशाहीच्या शेवटच्या काळात निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे यांनी पुष्कळ प्रयत्न केला. पुढे निजामशाही नष्ट झाल्यावर इसवी सन१६३७ साली झालेल्या तहा नुसार हा किल्ला शहाजीराजे यांनी मुघलांना दिला.
• पुढे हा किल्ला छत्रपती शिवराय यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यावेळी मराठा स्वराज्य व मुघल यांच्या संघर्षात कधी मुघल तर कधी मराठे यांच्या ताब्यात राहिला. छत्रपती शिवराय यांनी या किल्याचे नाव पर्वतगड ठेवले.
• पुढे इसवी सन १८१८ साली मराठा साम्राज्य नष्ट झाले. त्यावेळी इंग्रजांनी जुन्नर परिसरातील किल्ले जिंकून घेतले. त्यावेळी हा किल्ला ब्रिटीश सरकारच्या ताब्यात आला.
• पुढे १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.
• अशी आहे हडसर किल्याची ऐतिहासिक माहिती.
No comments:
Post a Comment
यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l