किल्ले जीवधन
Fort Jivdhan information in marathi
स्थान :
महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या सह्याद्री पर्वतातील उंच अशा या डोंगररांगेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून जाणाऱ्या अती प्राचीन नाणे घाट मार्गाच्या संरक्षणात अनेक किल्ले उभे केले गेले आहेत. यामध्ये शिवनेरी, हडसर, चावड, निमगिरी व जीवधन हे होत. यातील जीवधन हा किल्ला नाणेघाटाच्या जवळ असणारा किल्ला होय. येथून नाणेघाट फक्त २.५ किलोमीटर अंतरावर आहे.
• जीवधन किल्याची उंची :
जीवधन किल्याची सरासरी उंची ही ३७५४ आहे.
- जीवधन किल्यावर जाण्यासाठी वाहतूक मार्ग:
• पुणे शहरापासून जीवधन किल्ला हा १२३ किलोमीटर अंतरावर आहे.
• मुंबई या ठिकाणाहून जीवधन किल्ला हा १६० किलोमीटर अंतरावर आहे.
• पुणे जिल्ह्यातील जुन्नर, चाकण, मंचर, नारायणगाव पासून घाटघर या जीवधन किल्याच्या पायथ्याला असणाऱ्या गावापर्यंत आपणांस जाता येते.
• घाटघर गावातून पायी ट्रेकने आपण पाऊण तासात जीवधन किल्यावर जाऊ शकतो.
• जीवधन किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
• जुन्नर शहरापासून आपण घाट भागाकडे जाऊ लागलो. की आपण नाणेघाटाच्या जवळ असणाऱ्या घाटघर गावी गेल्यावर त्या ठिकाणी आपली गाडी अथवा वाहन पार्क करून जीवधन किल्याच्या दिशेने पायी प्रवास करत जाऊ शकतो.
• पायी चालत जाताना आपन घाटघर परिसरातील बांबूच्या बनातून पुढे चालत जीवधन किल्याच्या परिसरातील घनदाट अरण्यात पोहोचतो. येथून जाताना आपण काळजीपूर्वक जाणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या परिसरात अत्यंत विषारी सर्प वावरत असतात.
अशा या जंगली झाडीतल्या वाटेने जाताना आपणास सातवाहन काळातील अनेक दगडी अवशेष पहायला मिळतात.
• कात्याळातील पायरी मार्ग :
या जंगल वाटेने आपण उंच कात्याळी डोंगराच्या पायथ्याला येतो. त्याच्याकडेने असलेल्या वाटेने पुढे चालत गेल्यावर आपणास उंच डोंगराच्या कात्याळात कोरलेल्या पायऱ्या आढळतात. या पायरी मार्गाने गडाची सुरुवात होते.
• कात्याळ खडक अरुंद दरीमार्ग :
कात्याळ खडकातील पायरी मार्गाने आपण चढून वर येताना आपणास अत्यंत खड्या चढणीच्या पायऱ्या लागतात. तिथे हल्ली लोखंडी रॉड बसवल्याने चढण सोपी होते. तेथून पुढे दोन उंच कात्याळ कड्यांच्या मधून अरुंद वाट जाताना दिसते. त्या वाटेवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दगड वाहून आलेले पाहायला मिळतात. पावसाळी दिवसात या वाटेवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. त्यामुळे ट्रेक करणे अवघड असते.
• जीवधन किल्ला महादरवाजा:
कात्याळ पायरी मार्गाने आपण वरील बाजूस आल्यावर आपणास एक विशाल अशा खडकात खोदून तयार केलेला एक विशाल दरवाजा लागतो. अत्यंत सुरेख त्यावर कोरलेले कोरीव काम दिसून येते. या दरवाजाच्या बाजूस नालाकृती कात्याळी बुरुज पाहायला मिळतो. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेक्यांसाठी विश्रांती घेण्यासाठी देवड्या खोदून तयार केलेल्या पाहायला मिळतात.
• कात्याळ खोली :
महादरवाज्यातून आत गेल्यावर उजव्या बाजूस एक कात्याळात खोदलेली खोली आपणास पाहायला मिळते. छिन्नी हातोड्याचा वापर करत अत्यंत सुरेख अशी रचना पाहायला मिळते.
• पायरी मार्ग:
तेथून पुढे गेल्यावर आपणास एक पायरी मार्ग लागतो. त्याद्वारे आपण किल्याच्या वरील भागाकडे जाऊ शकतो. तसेच महादरवाजावर देखील जाऊ शकतो. महादरवाजावरील बुरुजावर गेल्यावर तेथून खालील भागाचे मनोहारी दर्शन घडते.
तसेच बुरुज व तटबंदी व त्यामध्ये केलेल्या जंग्या देखील जवळून अभ्यासता येतात.
• अजस्त्र शिळा असणारा किल्याचा भाग :
तटबंदी जवळून एक पायवाट आपणास किल्याच्यावरील भागाकडे घेऊन जाते. तेव्हा आपणास खडकाच्या अजस्त्र शिळा पाहायला मिळतात. ज्यांच्या मधून आपण किल्याच्यावरील टोकाकडे जाऊ शकतो. जिथे गेल्यावर संपूर्ण आजूबाजूचा डोंगरी परिसर, नाणे घाट, खोल दऱ्या आणि त्यामध्ये वसलेले घनदाट जंगल यांचे विहंगम दर्शन घडते.
• किल्याचा वरील भाग हा चढ-उतार व थोडाफार पसरट अशा स्वरूपाचा आहे. ज्यामध्ये पावसाळी दिवसात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले पाहायला मिळते. यामध्ये काही रान कीटक देखील पाहायला मिळतात. पावसाळ्यात गवत फुलांचे प्रदर्शन पाहण्याचा आनंद अनुभवता येतो. पण जाताना बरीच काळजी घ्यावी लागते. कारण तेव्हा येथील वाटा निसरड्या होतात. पण बरेच निसर्ग प्रेमी अन् ट्रेकर्स या ठिकाणी येत असतात.
• धान्य कोठार:
जीवधन किल्यावर सर्वात सुस्थितीत असणारी वास्तू म्हणून धान्य कोठराकडे पाहिले जाते. किल्याच्या एका बाजूच्या उतारावर दगडी शिल्पाकृती रचनेत बांधलेली वास्तू जी हेमाडपंथी बांधणीची असून भव्य दरवाजा आतील बाजूस देवड्या, वरील बाजूस घुमटाकार छत व कात्याळ भिंतीस लागून आत भुयारात बनवलेल्या खोल्या पाहिल्यावर इतर गडावरील कोठारांपेक्षा निराळी रचना पाहायला मिळते. एकात एक अशी पाच धान्य कोठारे येथे आहेत. व तत्कालीन लोकांची कष्ट करण्याची वृत्ती व वास्तुसंरचनेचे ज्ञान येथे दिसून येते.
• पाण्याची टाकी :
किल्याच्या बांधणीत खोदलेली अशी चार ते पाच पाण्याची टाकी आपणास पाहायला मिळतात. ज्यामध्ये पाणी पाहायला मिळते. ज्यामध्ये प्रचंड गाळ देखील आहे. यातील एका टाक्यात एक छोटासा खांब देखील आहे. जो पाण्याची क्षमता मोजण्यासाठी खडा असल्याचे जाणवते.
तसेच टाक्याच्या आतील बाजूस एक कात्याळ खोदून निर्माण झालेली देवडी देखील दिसून येते. या टाक्यातील पाणी हे पिण्यासाठी, खर्चासाठी तसेच अन्न शिजवण्यासाठी वापरले जात असावे. हल्ली या किल्ल्याकडे झालेल्या दुरावस्थेमुळे येथे मोठ्या प्रमाणात गाळ साठला आसून पाणी खराब शेवाळलेले पाहायला मिळते.
• जिवाई देवी मंदिर :
किल्याच्या वरील भागात भग्न मंदिराचे अवशेष पहायला मिळतात. मंदिरात एक मूर्ती असून ती जीवाई देवीची मूर्ती आहे. काळाच्या ओघात या मंदिराचे खंडारात रूपांतर झाल्याचे जाणवते.
• शिव मंदिर :
जीवाई देवीच्या मंदिरा जवळच आपणास एका आणखी छोट्याशा मंदिराचे अवशेष पहायला मिळतात. जेथे असणाऱ्या महादेव पिंडी वरून ते एक शिवमंदिर असल्याचे समजते. आजूबाजच्या दगडांवरून त्याची रचना जाणवते.
• खोल दरी व वानरलिंग सुळका :
जीवधन गडाच्या एका बाजूस टोकाला खोल उंच कडा आहे. त्या कड्यापासून थोडे समांतर दरीत एक उंच सुळका पाहायला मिळतो. तो आहे वानरलिंग सुळका. हा ३५० फूट उंच आहे.
जीवधन किल्यावर सुळक्यास समांतर अंतरावर कड्या खडकात अडकवलेल्या आहेत. तेथून सुळक्यापर्यंत समांतर दोर बांधून ट्रेकर्स चढाई करून ट्रेक करतात. हे ठिकाण गिर्यारोहकांना आकर्षित करते. हे ठिकाण अतिशय उंचावर आहे. येथून दरितील जंगलाचे दर्शन घडते.
• वरील सर्व ठिकाणे पाहून झाल्यावर परतीचा प्रवास करताना देखील अवघड जाते. जसा उंच चढाई करताना त्रास होतो. तसा खडा चढ उतरून जाताना देखील त्रास जाणवतो. पण यातून धीर धरायला व संयम पाळायचा गुण आपल्यामध्ये निर्माण होतो. पुन्हा पायरी मार्गाने उतरून गडाखाली यावे लागते. व आपला जीवधन किल्ला प्रवास संपतो.
• जीवधन किल्याविषयी ऐतिहासिक माहिती:
• हा किल्ला कोणी बांधला याबाबत ऐतिहासिक माहिती जास्त आढळत नाही.
• सातवाहन काळातील इतर परिसरात आढळलेल्या ऐतिहासिकदृष्ट्या पुराव्यावरून या ठिकाणी सातवाहन घराण्याची सत्ता काही काळ होती.
• सातवाहनांच्या नंतर चालुक्य, राष्ट्रकुट या महाराष्ट्रीय राजघराण्यांनी येथे राज्य केले.
• त्यानंतर इसवी सन ११७० ते १३०० या काळात येथे यादवांची सत्ता होती.
• इसवी सन १४८८ साली हा किल्ला निजामशाहीत होता.
• इसवी सन १६३६ साली निजामशाहीच्या शेवटच्या काळात शहाजीराजे भोसले यांनी निजामाचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम यास जीवधन किल्ल्यावरील कैदेतून सोडवून त्यास पेमगिरी किल्यावर नेले. व प्रती निजामशाही स्थापन केली. त्यावेळी जीवधन किल्याचा उल्लेख हा प्रथम ऐतिहासीक ब्रूर्हानी मासिक या निजामशाही पुस्तकात आढळतो.
• इसवी सन १६६३ मध्ये हा किल्ला मोघलांच्या ताब्यात आला.
• मध्यंतरी हा किल्ला कोणाच्या ताब्यात होता याबाबत ऐतिहासिक माहिती मिळत नाही. पण शेवटी हा किल्ला इंग्रजाच्या ताब्यात गेला.
• इसवी सन १८१८ नंतर ब्रिटिशांनी हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यातून काढून घेतला. त्यावेळी येथील धान्य कोठारास आग लावली. व किल्याची नासधूसही केली.
• हल्ली तो भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील एक भाग आहे. स्वतंत्र भारताचा भाग आहे.
• अशा ऐतीहासिक किल्ल्यास एकदा तरी भेट द्यावी. व महाराष्ट्रीय संस्कृतीच्या पाऊलखुणा पहाव्यात.
अशी आहे जीवधन किल्याची माहिती
Fort Jivdhan information in marathi