पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला
Padmdurg Fort
पद्मदुर्ग किल्ला माहिती व इतिहास मराठी
Padmdurg Fort information in marathi
“ पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावर दुसरी राजापुरी वसवली.”
असे ज्याचे वर्णन छत्रपती शिवरायांनी केले तो मराठ्यांच्या इतिहासातील भक्कम असा जलदुर्ग म्हणजे पद्मदुर्ग होय.
![]() |
पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला Padmdurg Fort information in marathi |
• स्थान :
भारत देशातील पश्चिम किनाऱ्यास लागून असलेल्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील मुरुड गावाजवळ समुद्रातील एका कासवाच्या आकाराच्या बेटावर बांधलेला जलदुर्ग पदमदुर्ग शिवकालीन इतिहासाची साक्ष देत आजही सुस्थितीत उभा असलेला पाहायला मिळतो.
• पद्मदुर्ग किल्याची उंची :
पद्मदुर्ग हा एक जलदुर्ग असून याची समुद्रसपाटी पासून उंची ही साधारण ५०० फूट आहे.
• पद्मदुर्ग किल्यावर जाण्यासाठी प्रवाशी मार्ग :
• पद्मदुर्ग हा किल्ला जलदुर्ग असल्याने समुद्रमार्गे येथे जाता येते.
• रस्ते मार्ग :
• अलिबाग – रेवदंडा – मुरुड – सागरी बोटीने पद्मदुर्ग.
• मुंबई – गोवा हाइवे वरील इंदापूर – तळा – भालगावमार्गे - मुरुड गाव व तेथून पद्मदुर्ग.
• मुंबई- गोवा हाइवे वरील नागोठणे / कोलाड येथून – रोहे – चणेरे बिरवाडी- मुरुड – राजापुरी रोड वरील एकसंबा गाव तेथून मच्छीमार बोटीने पद्मदुर्ग किल्ल्यावर जाता येते.
• पद्मदुर्ग हा किल्ला समुद्री किल्ला असल्याने भरती ओहोटीच्या कक्षा तसेच हवामानातील बदल पाहून येथील मच्छीमार कोळी पद्मदुर्ग किल्यावर घेऊन जातात.
• पद्मदुर्ग किल्याचे दुसरे नाव कासा असे आहे.
• पद्मदुर्ग किल्यावर जाण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अनुमतीने या किल्यावर जाता येत होते. हल्ली तेथील कस्टम कार्यालय हलवले आहे. दिवसभर यांत्रिकी नावा द्वारे जाता येते.
• पद्मदुर्ग किल्याची बांधणी का केली गेली?
-घरात जैसा उंदीर तैसा स्वराज्यास सिद्दी.
पूर्व आफ्रिका खंडातील सुलतानासोबत आलेले निग्रो म्हणजेअब्येसेनियन लोक ज्यांना स्थानिक लोक हबशी म्हणत. त्यांना पुढील काळात या लोकांना सिद्दी या नावाने ओळखले जाऊ लागले. यांनी मुरुड जवळील जंजीरा किल्ला ताब्यात घेतला. व आपली सागरी सत्ता निर्माण त्यांनी केली. हे इस्लाम धर्मीय होते. ते समुद्रकिनाऱ्यावरील लोकांना उपद्रव देत. लूटमार करत. स्त्रियांना उचलून नेत. तसेच त्यांनी हिंदवी स्वराज्यातील किनारी प्रदेशात बराच हैदोस घातला होता. तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच सागरी शत्रू इंग्रज, पोर्तुगीज, डच यांच्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी छत्रपती शिवराय यांनी आरमार उभा केले. त्यातील एक भाग म्हणजे जंजिऱ्याच्या सिद्दीच्या उपद्रवास अटकाव करण्यासाठी छत्रपती शिवराय यांनी पद्मदुर्ग किल्ला बांधला. व सिद्दीच्या कारवायांना पायबंद घातला.
• पद्मदुर्ग किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
• समुद्री किनारा भिंत :
पद्मदुर्ग किल्ला व पडकोटा जवळील समुद्रात एक तटबंदी असणारी भिंत आपणास पाहायला मिळते. समुद्री लाटांचा जास्त वेगाने मारा किल्यावर बसू नये म्हणून एक तटबंदी असणारी भिंत आपणास पाहायला मिळते. ती पडकोटाचा एक भाग होती.आजही ही तटबंदी आपणास समुद्री लाटांशी तोंड देत उभा असलेली दिसते.
• पडकोट :
मुरुड कडून आल्यावर पडकोटाजवळ आपल्या नावा नांगरून आपण किल्याच्या दिशेने जाऊ शकतो. हल्ली या पडकोटातील तटबंदीची बरीचशी झीज झालेली दिसते. पडकोट म्हणजे किल्याच्या सुरक्षेसाठी त्याच्या समोरील बाजूस बांधलेला सुरक्षेसाठी तट असणारा कोट. ज्याचा उपयोग किल्याच्या किनारी भागात उतरून किल्ल्यापर्यंत जाण्या अगोदर येणाऱ्या व्यक्तीची शहानिशा करण्यासाठी केला जात असे. हा एक छोटा किल्लाच असतो. ज्याच्या तटबंदीवरून समुद्रावरून येणाऱ्या शत्रू जहाजांचा वेध घेण्यासाठी केला जातो. तसेच या कोटाच्या आत बालेकिल्ला पाहायला मिळतो.
• पाकळीचा कमळबुरुज :
पडकोटास लागून असलेला एक बुरुज जो किल्याच्या पश्चिम दरवाजाजवळ आहे. त्यावरील बुरुजावर असणाऱ्या बाजूस कमळाच्या पाकळी सारखी रचना दिसते. वरून ड्रोनच्या साहाय्याने जर का पाहिले तर ते कमळाप्रमाणे भासते. कमळास संस्कृत भाषेत पद्म म्हणतात म्हणूनच या किल्यास पद्मदुर्ग असे म्हणतात.
• कोटेश्वरी मंदिर :
पडकोटामध्ये एक मंदिर आपणास पाहायला मिळते ते कोटेश्वरी देवीचे मंदिर आहे.आजही भग्नावस्थेत असणार्या मंदिरात किल्याच्या रक्षणासाठी शस्त्र सज्ज आहे.
• पश्चिम दरवाजा :
पद्मदुर्ग किल्यावर किनारी भागात उतरल्यावर आपणास पश्चिमेस एक भक्कम अशा अवस्थेत एक भव्य दरवाजा आपणास पाहायला मिळतो. तो आहे पश्चिम दरवाजा. हा दरवाजा बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. येथून आत गेल्यावर आपणास अनेक वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात.तसेच या दरवाजाची बांधणी इतर किल्यासारखी असून या दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या पहारेकऱ्यांना विश्रांतीसाठी बनवलेल्या आहेत.
• पद्मदुर्ग किल्ल्याची तटबंदी :
पद्मदुर्ग किल्याची तटबंदी अत्यंत भक्कम अशा अवस्थेत पाहायला मिळते. तटाच्या भिंती अत्यंत जाड असून जागोजागी त्यावर चढूण जाण्यासाठी पायऱ्या ठेवलेल्या पाहायला मिळतात. व त्यावरून आपण आरामात चालत व धावत जाऊ शकतो. तसेच अनेक जंग्या व फांज्या देखील पाहायला मिळतात.
• जंगी : तटाच्या भिंतीत ठेवलेली छिद्रे ज्यातून बंदूक किंवा बाणाने बाहेरून आलेल्या शत्रूवर सुरक्षित राहून निशाणा साधता येतो.
• फांज्या :
ही आकाराने मोठी छिद्रे असतात ज्यामधून तोफेच्या साहाय्याने शत्रूचा वेध घेता येतो.
• टेहळणी बुरूज :
जागोजागी आपणास टेहळणी बुरूज पाहायला मिळतात. ज्यातून समुद्राच्या सभोवती नजर ठेवता येते. तसेच या बुरुजाच्या मध्ये जागोजागी फांज्या व जंग्या देखील पाहायला मिळतात.
• पाणी साठवनी हौद :
आजही सुस्थितीत या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी बनवलेले तीन मोठे हौद पाहायला मिळतात. त्यामधील दोन कोरडे आहेत. तर एकामध्ये पाणी पाहायला मिळते.
तिसऱ्याा हौदात एक छोटा झरा आहे. ज्यातून शुद्ध पिण्यायोग्य पाणी पाझरत असते.
• शिबंदीतील लोकांसाठी बांधल्या गेलेल्या वास्तूंचे अवशेष :
गडावर काम करणारे शिबंदीतील शिपाई तसेच इतर नोकर यांना राहण्यासाठी तटबंदीस लागून खोल्या केल्या होत्या. त्यांचे अवशेष पहायला मिळतात. काही लोक ते कस्टम शिपायांना राहण्यासाठी बनवल्याचे सांगतात
मशीद :
किल्ल्यामधे आतील बाजूस एके ठिकाणी मशिदीचे अवशेष पहायला मिळतात. शिबंदीत असणाऱ्या मुस्लिम सैनिकांना नमाज पठण करण्यासाठी ती बांधली गेली असावी.
• वाडे व रहिवासी वस्तूचे अवशेष :
शिवकालातील तसेच अलीकडील काळातील बांधल्या गेलेल्या इमारतीचे अवशेष आपणास या ठिकाणी पाहायला मिळतात. हा किल्ला कस्टम अधिकाऱ्यांच्या ताब्यात होता. तेव्हा त्यांच्या रहिवासासाठी बांधल्या गेलेल्या इमारती देखील या ठिकाणी दुरावस्थेत असलेल्या पाहायला मिळतात.
त्या इमारतीतील रचना पाहता तिथे स्वयंपाकघर, बाथरूमसह सारी सोय केल्याचे दिसते.
• तोफा :
पद्मदुर्ग या किल्यावर आपणास जवळ जवळ ३८ ते ४० तोफा पाहायला मिळतात. इतर किल्याच्या मनाने या ठिकाणी तोफा जास्त पाहायला मिळतात. जलदुर्ग असल्याने सागरी हल्ला करणाऱ्या जहाजांना तोंड देण्यासाठी त्या ठेवल्या गेल्या होत्या. तसेच तोफगोळे देखील सापडले आहेत. ते पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात घेतले आहेत.
• पुर्व दरवाजा :
किल्याच्या पुर्व बाजूस एक दरवाजा आपणास आजही सुस्थितीत असलेला पाहायला मिळतो.त्याच्या वरील बुरुजाच्या तोफा त्याच्या शेजारी ठेवल्याचे दिसून येतात. यांची बांधणी देखील पश्चिम दरवाजा सारखी आहे.
• शिवकालीन बांधकामाचे वैशिष्ट्य :
कोणत्याही कामकाजात अत्यंत बरकावा व प्रामाणिकपणा हा शिवकालीन बांधकामात दिसून येतो. पद्मदुर्ग किल्याच्या तटबंदीवर अहोरात्र सागरी लाटांचा मारा होताना दिसून येतो. खाऱ्या पाण्याच्या लाटांनी बांधकामातील दगडांची बरीचशी झीज झाल्याची दिसून येते.
मात्र दोन दगडांच्यामधील चूना जसाच्या तसा दिसून येतो. याचे वैशिष्ट्ये म्हणजे हा चूना बनवताना गुळ, हीर्डीचा पाला, चूना , राळ, कात्याचा वापर करून बनवला गेला आहे. त्यामुळे बांधकामात टिकावूपणा दिसून येतो. आजही ३५० वर्षे उलटली तरी तो टिकून आहे.
• फरसबंदी बांधकाम :
पद्मदुर्ग किल्याच्या एका बुरुजावर आपणास फरशी घातलेली पाहायला मिळते. तेथे असणाऱ्या जंग्या मध्ये तोफा देखील दिसतात. ज्या अजूनही किल्याच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे जाणवते.
• ध्वजस्तंभ :
पश्चिम दरवाजा जवळील पडकोटात आपणास कमळाच्या पाकळीच्या अकराच्या बुरुजावर आपणास ध्वजस्तंभ पाहायला मिळतो. या ठिकाणी स्वराज्याचा भगवा ध्वज फडकवला जात असे. आता फक्त तिथे ध्वजस्तंभाचा चौथरा पाहायला मिळतो.
• विहीर :
पडकोटात एका चौकोनी विहिरीचे अवशेष पहायला मिळतात. जी पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी केली होती.
• पद्मदुर्ग किल्ल्यावरून आपण जंजीरा किल्ला, मुरुडचा किनारी भाग पाहू शकतो.
पद्मदुर्ग किल्याविषयी ऐतिहासिक घडामोडी :
• पद्मदुर्ग किल्याचे बांधकाम इसवीसन १६७०-७२ साली छत्रपती शिवरायांच्या काळात सुरू केले. ते इसवी सन १६७५ साली पूर्ण झाले.
• स्वराज्याचा समुद्री शत्रू म्हणजेच पपाउंदीर म्हणून समजल्या गेलेल्या जंजिऱ्याच्या सिद्दीच्या स्वराज्य विरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी पद्मदुर्गाची निर्मिती झाली.
• पद्मदुर्ग बांधणी करताना सिद्द्यांनी भरपूर अटकाव केला. पण तो मोडीत काढून हा जलदुर्ग छत्रपती शिवराय यांनी बांधून काढला.
• पद्मदुर्ग या जलदुर्गाचा प्रथम किल्लेदारपदी सुभानजी मोहिते याची नेमणूक केली गेली.
• स्वराज्याच्या आरमारात असणाऱ्या लाय पाटील कोळ्याने जंजिऱ्याच्या सिद्दी विरुध्द मोरोपंत प्रधानांच्या मदतीने योजना आखली. व आपल्या सहकाऱ्यांसह रात्रीच्या वेळी जंजिऱ्यावर हल्ला करून मागील बाजूने तटास सिडे लावून चढून जाण्याचे धाडस केले. मात्र मोरोपंतांची व लाय पाटलांची वेळ जुळून आली नाही त्यामुळे माघार घ्यावी लागली. व प्रयत्न फसला गेला. छत्रपती शिवराय यांना हे समजताच यमपुरी म्हणजे जंजीर्यास सिडी लावून चढन्याचे धाडस करणाऱ्या लया पाटील यास पालखीचा मान देवू केला. पण दर्यात राहणाऱ्या कोळी लोकांना पालखीचा काय उपयोग म्हणून नम्रतेने त्यांनी ती पालखी परत केली. तेव्हा छत्रपती शिवराय यांनी विचार करून एक गलबत बनवून घेतले, व त्याचे नाव पालखी ठेवून ते लाय पाटलास भेट म्हणून दिले. तसेच छत्र, वस्त्रे, निशाणी, तसेच दर्या किनाऱ्याची सरपाटीलकी दिली. असा बहुमान केला.
• छत्रपती संभाजी राज्यांच्या कारकिर्दीत हा किल्ला स्वराज्यात होता.
• राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत जेव्हा मुघल आक्रमण स्वराज्यावर होते. तेव्हा हा किल्ला जंजिऱ्याच्या सिद्दीने काबीज केला.
• इसवी सन २ डिसेंबर १७५९ साली सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नातू राघोजी आंग्रे यांनी सिद्यांच्या ताब्यातून हा किल्ला जिंकून घेतला.
• पुढे इसवी सन १८१८ नंतर हा इंग्रजांनी इतर किल्यासोबत ताब्यात घेतला.
• पुढील काळात या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाले.
• आजकाल या ठिकाणी तुरळक पर्यटक फक्त येतात. येथील परिसर बराचसा स्वच्छ असल्याचे पाहायला मिळते.
• सागरी भरती ओहोटी मुळे या ठिकाणी समुद्री वाळू शंख, शिंपले पाहायला मिळतात.
• येथे इतर किल्यापेक्षा जास्त तोफा पाहायला मिळतात. त्या ओतीव घडीव अशा फिरंगी तोफा आहेत. तसेच तोफगाडे ही आहेत.
अशी आहे पद्मदुर्ग ऊर्फ कासा किल्ल्याची माहिती.
Padmdurg Fort information in marathi