सिंहगड उर्फ कोंढाणा किल्ला
Sinhagad Fort information in marathi
![]() |
सिंहगड उर्फ कोंढाणा किल्ला Sinhgad Fort information in marathi |
किल्ले कोंढाणा हा स्वराज्यातील महत्वाचा गिरिदुर्ग त्याबाबत राजमाता जिजाबाई योग्य निरीक्षण करू शकतात. ते खालीलप्रमाणे
“ शिवबा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या ताब्यात असणे बरं नाही. तो स्वराज्यात घे.”
स्थान :
महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात पुण्याच्या नैऋत्येस २५ कि.मी. सह्याद्री डोंगर रांगेतील पूर्व बाजूस पसरलेल्या भुलेश्वरपर्यंतच्या डोंगररांगेत हा गिरिदुर्ग उभा आहे.
उंची :
सिंहगड या किल्ल्याची सरासरी उंची ही १३१२ मीटर / ४३०४ फूट आहे.
पायथ्यापासून सरासरी उंची ही ७५० मीटर आहे.
सिंहगडावर जाण्याचे मार्ग :
• पुण्यापासून - वडगाव- खडकवासला मार्गे सिंहगडाच्या पायथ्याला जाता येते.
• कात्रज घाटमार्गे शिवापूर मार्गे सिंहगडावर गाडीमार्गे जाता येते. किल्ल्यावर पार्किंगची सोय आहे.
सिंहगड उर्फ कोंढाणा किल्ला Sinhgad Fort information in marathi
सिंहगड किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:
• पुणे दरवाजा :
सिंहगडावर गाडी मार्गे आल्यावर पार्किंग पासून पुढे चालत गेल्यावर पुणे दरवाजा लागतो. आज ही सुस्थितीत बांधकाम असलेला हा दरवाजा आहे.
• तेथून पुढे पायरी मार्गाने वर गेल्यावर आणखी एक दरवाजा लागतो. व त्यानंतर पुढे आणखी एक अशाप्रकारे तिन दरवाजांची अशी ही श्रृंखला आहे.
• दारूगोळा कोठार Sinhgad:
तिस-या दरवाजापाशी उजव्या बाजूस दारूगोळा इमारत लागते. तोफेसाठी लागणारी दारू इथे ठेवली जात होती.
• इसवी सन १७५१ साली या ठिकाणी वीज पडली होती. यामध्ये या कोठाराचे नुकसान तर झालेच. शिवाय तिथे राहणाऱ्या फडणवीस यांच्या घरावर देखील वीज पडली. व त्यामध्ये त्यांचे सर्व कुटुंब मरण पावले.
• घोड्यांची पागा सिंहगड:
दारूगोळा कोठारापासून पुढे गेल्यावर कात्याळात बांधलेली घोड्यांची पागा लागते. एखाद्या लेणी गुंफेसारखी तिची रचना आहे. त्या काळात इथे घोडी बांधली जात. व त्यांचा चारापाणी इथे होत असे.
टिळक बंगला :
तिथून पुढे गेल्यावर टिळक बंगला लागतो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी तो रामलाल नंदलाल नाईक यांच्याकडून विकत घेतला. ते नियमित येथे विश्रांतीसाठी येत असतं. इ.स.१९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची इथेच भेट झाली.
कोंढाणेश्वर मंदिर :
हे शिव मंदिर असून इथे एक पिंड व नंदी पाहायला मिळतो. कोंढाणेश्वर हे यादवांचे कुलदैवत आहे.
श्री अमृतेश्वर मंदिर :
कोंढाणेश्वर मंदिरापासून पुढे गेल्यावर डावीकडे अमृतेश्वर मंदिर आहे. या मंदिरात भैरव व भैरवी या देवतांच्या मुर्त्या पाहायला मिळतात. भैरवाच्या हाती राक्षसाचे मुंडके आहे. या ठिकाणी मूळ कोळी लोकांची वस्ती होती. त्यांचे हे कुलदैवत आहे.
नरवीर तानाजी मालुसरे समाधी व स्मारक :
कोंढाणा जिंकण्याच्या स्वारीवर गेल्यावर युद्धावेळी नरवीर तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. अमृतेश्वर मंदिराच्या मागील बाजूने वर चढून गेल्यावर आपणास तानाजी मालुसरे स्मारक लागते. या ठिकाणी जागोजागी लढवय्या मावळ्यांची शिल्पे उभा केली आहेत. त्या सभोवती सुंदर उद्यानाची निर्मिती केलेली दिसून येते. या स्मारकाच्या मध्यभागी नरवीर तानाजी मालुसरे यांचा भव्य पुतळा पाहायला मिळतो. तसेच इथे त्यांची समाधी देखील पाहायला मिळते.
देवटाके :
नरवीर सुभेदर तानाजी मालुसरे यांच्या समाधी पासून पुढे गेल्यावर डावीकडे छोटा तलाव लागतो. तेथून पुढे काही अंतरावर एक पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. ते देवटाके. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा या टाक्याचे पाणी मागवत असत.
राजाराम स्मारक :
स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी देखील इथे पाहायला मिळते. राजस्थानी शिल्पशैली पद्धतीची बांधणी या समाधीची आहे. छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्यनंतर संपूर्ण स्वराज्याची जबाबदारी ही राजाराम महाराजांवर पडली. सलग ११ वर्षे मोगलांशी त्यांनी संघर्ष करून स्वराज्याची ज्योत तेवत ठेवली. वयाच्या ३० व्या वर्षी म्हणजेच ३ मार्च १७०० साली सिंहगडावर निधन झाले.
डोणगीरी उर्फ तानाजीचा कडा :
झुंजार बुरुजामागे तटाच्या बाजूस आपणास एक उंच पश्चीम कडा लागतो. त्यास डोणगिरीचा किंवा पश्चिमकडा असे म्हणतात. हा कडा चढून नरवीर तानाजी मालुसरे व मावळ्यांनी गड सर केला.
कल्याण दरवाजा :
गडाच्याा पश्चिमेला एक बुलंद दरवाजा आहे. एका आड एक, असे दोन दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात. या दरवाजाचा पायथ्याशी कल्याण गाव आहे. या गावाहून चढून वर आल्यावर हे एकामागून एक दरवाजे लागतात, म्हणून त्या दरवाजाला कल्याण दरवाजा असे म्हणतात . चढण्यास कठीण असा हा पायऱ्यांचा दरवाजा मार्ग आहे. याच्या बाजूला भक्कम बुरूज बांधला आहे. या ठिकाणी हत्ती शिल्पे पाहायला मिळतात. तसेच दरवाजावरील जंग्या ह्या वाटेवरील शत्रूस वेधण्यात अत्यंत नियोजनबध्द बांधल्या गेल्या आहेत. तानाजी मालुसरे व मावळ्यांनी कडा चढून आल्यावर लढा देत पश्चिमेचा हा कल्याण दरवाजा उघडला व बाहेरील मावळे व सुर्याजी मालुसरे यांच्या सोबत मिळून शत्रूचा धुव्वा उडवला. व हा किल्ला स्वराज्यात दाखल केला.
उदेभान स्मारक :
सिंहगडावर टेकडीवर एक चौकोनी दगड आहे. ते उद्येभान स्मारक आहे.
झुंजार बुरुज :
पाण्याच्या टाक्याच्या पासून पुढे गेल्यावर एक बुरुज लागतो. तो आहे झुंजार बुरुज. हे सिंहगडाचे शेवटचे टोक मानले जाते. या ठिकाणावरून किल्ले तोरणा व किल्ले राजगड पाहायला मिळतो. पूर्वेस पुरंदर किल्ला पाहायला मिळतो. तसेच पानशेत धरणाचा जलाशय देखील पाहायला मिळतो.
सिंहगडाच्या विषयी थोडक्यात ऐतिहासिक घडामोडी :
• कोंढाणा हे या किल्ल्यास नाव कोंदिण्य या ऋषींच्या नावावरुन पडले आहे. येथे प्राचीन काळी कोंदिण्य ऋषींचा आश्रम होता.
• तसेच या ठिकाणी पूर्वी पासून द्रविड महादेव कोळी लोक राहत होते. त्यांनीच या ठिकाणास किल्ल्याची ओळख करून दिली.
• कोळी राजा नाग नाईक यांच्याकडून इसवी सन १३२८ साली मोहम्मद बिन तुघलक याने हा किल्ला ताब्यात घेतला. आपली सत्ता मंगोल अक्रमकांपासून वाचवण्यासाठी त्याने देवगिरीला राजधानी हलवली. तेव्हा दक्षिण विस्तार करण्याच्या दृष्टीने त्याने हा किल्ला जिंकला. पण त्यास कडवा प्रतिकार सहन करावा लागला. रसद किल्ल्यावरील संपली म्हणून किल्ला दिला गेला.
• मुहम्मद तुघलक दिल्लीला गेल्यावर पुन्हा हल्ला करून महादेव कोळी लोकांनी पुन्हा हा किल्ला जिंकला.
• निजामशाहीपर्यंत हा महादेव कोळी समाजाच्या सरदाराकडे हा किल्ला होता.
• निजामशाही नंतर हा किल्ला आदिलशाहीत गेला.
• आदिलशाही काळात दादोजी कोंडदेव यांनी या किल्ल्याचे सुभेदार म्हणून काम केले.
• त्यानंतर हा किल्ला स्वराज्यात शिवरायांनी समाविष्ट केला. व इसवी सन १६४७ साली येथे लष्कर भरतीसाठी केंद्र काढले गेले. त्याचा कारभार दादोजी कोंडदेव पहात असतं.
• इसवी सन १६४९ साली शहाजी राजांच्या सुटकेसाठी हा किल्ला आदिलशहाला दिला.
• त्यानंतर पुन्हा स्वराज्यात हा किल्ला घेतला गेला.
• पुरंदर तहाच्या वेळी हा किल्ला परत मोघलांना दिला गेला. तेव्हा मोघल सरदार उदेभान या राजपूत किल्लेदाराची नेमणूक करण्यात आली.
• हा किल्ला पुन्हा स्वराज्यात घ्यायचं ठरले. तेव्हा नरवीर तानाजी मालुसरे व शेलारमामा अन् सूर्याजी मालुसरे यांनी व त्यांच्या गटातील मावळ्यांनी हा किल्ला सर करून जिंकून घ्यायचे ठरवले.
![]() |
सिंहगड उर्फ कोंढाणा किल्ला Sinhgad Fort information in marathi |
• इसवी सन ४ फेब्रुवारी १६७० रोजी तानाजी मालुसरे आपल्या ३०० मावळ्यांबरोबर पश्चिम बाजूचा द्रोणागिरी कडा कपारीत हात घालत चढून व दोर लावून वर येऊन जोरदार हातघाईची लढाई झाली. तानाजीची ढाल उदेभान राजपुताशी लढताना तुटली. डोक्याचा शेला हाताला गुंडाळून त्यावर वार झेलत तानाजी उदेभानाशी लढताना धारातीर्थी पडला. तोपर्यंत कल्याण दरवाजा उघडला होता. सूर्याजी ५०० मावळे घेऊन आत आला. भावाच्या मृत्यचा शोक करत न बसता त्यांनी जोरदार हातघाई करून मोघल फौजेचा धुव्वा उडिवला. व गवताची गंजी पेटवून किल्ला जिंकल्याची सूचना दिली. जेव्हा छत्रपती शिवाजी राजांना नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्याचे समजले तेव्हा त्यांना खूप दुःख झाले. तेव्हा राजे म्हणाले, “ गड आला पण सिंह गेला” तेव्हा पासून या किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवले.
सिंहगडाच्या विषयी थोडक्यात ऐतिहासिक घडामोडी :
• त्यानंतर हा किल्ला कधी मोघल कधी मराठ्यांच्या ताब्यात राहिला.
• या किल्ल्याचे वैशिष्टै म्हणजे या किल्ल्यावरून किल्ले तोरणा, पुरंदर, वज्रगड, राजगड व आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवता येते. प्रचंड मुलुख देखरेखीत राहतो.
'जेम्स डग्लस हा पाश्चात्य निरीक्षक या किल्ल्यास सिंहाची गुहा असे संबोधतो.'
सिंहगड उर्फ कोंढाणा किल्ला Sinhgad Fort information in marathi