रतनगड किल्ला माहिती
Ratangad Fort information in Marathi
• स्थान:
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रतनवाडी तसेच साम्रद गावाजवळ रतनगड किल्ला आहे. तो सह्याद्री पर्वतात असून तो ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर आहे.
• उंची :
रतनगड किल्ला समुद्र सपाटी पासून ४३००फूट उंचीवर आहे.
• किल्ल्याजवळील ठिकाणे व प्रवाशी मार्ग:
• रतनगड किल्याच्या पायथ्याशी साम्रद व रतनवाडी ही गावे आहेत.
• रतनवाडी पासून ६ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.
• साम्रद पासून रतनगड २ किलोमीटर अंतरावर आहे.
• भंडारदरा पासून रतनगड हे अंतर २३किलोमीटर आहे.
• पुणे ते रतनगड हे अंतर १८३ किलोमीटर आहे.
• मुंबई पासून रतनगड हे अंतर १९७ किलोमीटर आहे.
• मुंबई कडून येताना ठाणे – कल्याण – मोरोशी – खुटाळबारागाव - शिरोशी – देहेन इथून पुढे आपण रतनगड परीसरात पोहोचू शकतो.
• नाशिक कडून येताना विल्होळी – पिंपळाड नाशिक – गोंडेदुमाला - मुंढेगाव - घोटी बुद्रुक – वसाळी – भंडारदरा – रतनवाडी – रतनगड
• पुणे येथून – मंचर – नारायणगाव – आळेफाटा – ओतूर – कोतुळ – राजुर – भंडारदरा – रतनवाडी येथून रतनगडाला जाता येते.
• वसाळी येथून चींचोडे – पांजरे – शिंगणवाडी – रतनगड फोर्टट्रेक येथून पुढे साम्रद रतनगड रोड व तेथून रतनगडाला जाता येते.
• साम्रद व रतनवाडी ही दोन गावे रतनगड किल्याच्या वाटेवर आहेत.
• रतनगड किल्ल्याजवळ पाहण्यासारखी ठिकाणे:
• अमृतेश्वर मंदिर रतनवाडी:
रतनवाडी गावात आपण ज्यावेळी पोहोचतो. तेव्हा या गावी आपणास एक भव्य हेमाडपंथी बांधणीचे मंदिर पाहायला मिळतें. हे मंदिर शिलाहार राजा झांज याने बांधले आहे. हे ठिकाणं प्रवरा नदीच्या उगम प्रदेशापाशी आहे. महान शिव उपासक झांज राजाची बारा ज्योतिर्लिंगे आपल्या राज्यात स्थापना व्हावी अशी इच्छा होती. या साठी आपल्या राज्यातील नद्यांच्या मुखाशी त्याने महान शिवमंदिर बांधली. त्यातील एक मंदिर म्हणजे रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिर होय.
समुद्र मंथन करून मिळालेले अमृत एका राक्षसाने देवांचे रूपांतर घेवून प्राशन केले. त्यावेळी श्री विष्णूनी त्याचे सुदर्शन चक्र चालवून संधान केले. तेव्हा त्याच्या शरीराचे दोन भाग झाले. त्यापैकी एक राहू तर दुसरा केतू या नावानं ओळखली जातात. त्यावेळी त्यांच्या या संधान वेळी जे अमृताचे दोन थेंब खाली पडले. ते या अमृतेश्वर मंदिर असलेल्या ठिकाणी पडले.
हे मंदिर अत्यंत सुंदर स्तंभ व त्यावर बारीक कलाकुसर केलेले पाहायला मिळते. बेसाल्ट या काळ्या दगडात कोरलेली सुंदर नक्षी तसेच जागोजागी अन्य देवी देवतांची शिल्पाकृती लक्ष वेधून घेते. मंदिरा बाहेर भग्न नंदी असून त्या शेजारी अन्य मुर्त्या देखील पाहायला मिळतात. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद असून मागील बाजूने आपणास मंदिरात जाता येते. मंदिराच्या आत विस्तृत अशी बैठक असून गाभाऱ्यात पाण्यात शिवलिंग पाहायला मिळते. बाहेर विस्तृत आवार आहे.
• विरगळ व अन्य मुर्ती :
मंदिर परिसरात एके ठिकाणी आपणास झाडाखाली अनेक विरगळ व अन्य हिंदू देवतांच्या मुर्ती पाहायला मिळतात.
• पुष्करणी तलाव:
मंदिर आवारात सुरेख असा बांधीव कट्ट्याचा पुष्करणी तलाव पाहायला मिळतो. त्यामधे जागोजागी देवड्या करून त्यामधे सुंदर देवी मुर्त्या कोरलेल्या पाहायला मिळतातं. त्याभोवती सुंदर नक्षी कोरलेली शिल्पे देखील पाहायला मिळतें.
• नदी शेजारील पायवाट :
रतनवाडी गावाजवळील नदी पुल पार केल्यावर पुलाच्या डावीकडील भातखाचरा शेजारून पायवाट ही रतनगड किल्ल्याकडे जाते. या वाटेने आपणास पुढे घनदाट जंगल असलेले पाहायला मिळते.
• खडा कात्याळ पायरी मार्ग:
या वाटेने आपण जंगलातून रतनगडाच्या खड्या चढाला लागतो. आपणास त्यावेळी कात्याळ खडकात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात.
![]() |
साम्रद मार्ग |
• सिडी मार्ग :
गडावर चढण करताना काही ठिकाणी तुटलेल्या मार्गावर सिडी उभा केलेली पाहायला मिळते.
• साम्रद मार्गे जाताना आपणास प्रथम जंगली झाडीतून वर चढून गेल्यावर पुढे दरीचा भाग लागतो. तेथून पुढे दगडी पायरी मार्ग लागतो.
• गणेश दरवाजा:
गडावर जातेवेळी आपणास रतनवाडी मार्गे गेल्यावर गणेश दरवाजा लागतो. अत्यंत भव्य असा हा दरवाजा आहे. सुरेख हिंदू शिल्प रचना या ठिकाणी दिसून येते. या दरवाजावर आपणास कमळ व हिंदू देवता शिल्पाकृती दिसून येते.
• त्रिंबक दरवाजा (कल्याण दरवाजा )
साम्रद कडून येताना आपणास लागोपाठ सलग ठराविक अंतरावर दरवाजे लागतात. या दरवाजाची निर्मिती ही खडक खोदून तयार केलेली आहे. दरवाजावर कमल्पुष्प व इतर हिंदू शिल्पाकृती पाहायला मिळते.
• खड्या पायऱ्या :
या दरवाजातून गडाच्या वरील भागात जाण्यासाठी पायरी मार्ग आहे.
• लोखंडी पाईप रॉड व वाट:
थोड वर चढून गेल्यावर खडा चढ लागतो. तो चढून जाण्यासाठी आपणास लोखंडी पायपांचा सपोर्ट असलेला मार्ग लागतो. या वाटेने गडाच्या वरील भागात जाता येते.
• रण मंडळ वाट:
• पाईप मार्गाने वर जाताना कात्त्याळ कडेने वाट आहे. शत्रू या वाटेने आल्यास त्यावर वरील बाजुस असणारे सैन्य हे दगड वर्षाव करून नामोहरम करू शकत असत.
• हनुमान दरवाजा :
गडाच्या वरील बाजूस आपणास एक दरवाजा लागतो. त्यास हनुमंत दरवाजा असे देखील म्हंटले जाते. या ठिकाणी हनुमंत देवतेची मूर्ती कोरलेली पाहायला मिळते.
• त्र्यंबक दरवाजा कडून येताना सलग असणारा दरवाजा हा बुलंद असून तो आजही सुस्थितीत असलेला दिसून येतो.
• पाण्याची टाकी :
गडावर आपणास भरपूर पाण्याची टाकी पाहायला मिळतात. जी पावसाळी पाणी सखल भागात जिकडे वाहते त्या ठिकाणी खोदलेली पाहायला मिळतातं. या टाक्यांमध्ये सलगता असून एका टाक्यातून पाणी दुसऱ्या टाक्यात यावे अशी रचना केलेली पाहायला मिळते. या टाकीतून खोदून काढलेले दगड तटबंदी बांधण्यासाठी उपयोगात आणलेले पाहायला मिळतात.
• निढे:
गडावर आपणास एके ठिकाणी डोंगरात निसर्ग निर्मित अशी रचना असलेलं निढं पाहायला मिळते. येथे उभे राहून संपूर्ण प्रदेशाची पाहणी करता येते.
- बुरूज :
गडावर काही मोक्याच्या ठिकाणीं बुरुजांची बांधणी केलेली दिसते. किल्याची सुरक्षितता व निरीक्षण व टेहळणी करण्यासाठी या बुरुजांची मदत होत असे.
• चोर दरवाजा:
गडाच्या पश्चिम बाजूस एक चोर दरवाजा आहे. ज्यामधून खाली उतरणे अवघड आहे. संकटकाळी गडावरून शत्रूस चकवा देवून उतरण्यासाठी या मार्गाचा वापर केला जात असे.
• नैसर्गिक बुरूज व अर्धं चंद्राकृती टाके:
आपणास गडाच्या रचनेच निरीक्षण करताना गडाचे कात्याळ नैसर्गिक तासीव कडे पाहिल्यावर या गडाच्या भव्यतेची कल्पना येते असाच एक कडा तासीव बुरुजसारखा आहे. त्याच्या वरील बाजुस पहारेकरी शिपाई यांची तहान भागवणेसाठी. नालाकृती टाक्यांची रचना केली आहे.
• इमारती अवशेष :
गडावर आपणास अनेक ठिकाणी इमारतीचे अवशेष पहायला मिळतात. हे तत्कालीन राजे राजवाडे, पहारेकरी यांसाठी निवासस्थाने बांधलेली होती. त्यांचे अवशेष पहायला मिळतात.
• रत्नादेवी गुहा मंदिर :
गडावर आपणास कात्याळ खडक खोदून बनवलेल्या अनेक गुहा पाहायला मिळतात. त्याठिकाणी रत्नादेवी असलेली एक गुहा आहे. या देवीच्या नावावरून रतनगड हे नाव पडले आहे.
• गुहा :
गडाच्या कात्याळ खडकात अनेक निवासासाठी गुहा तसेच अंतर्गत पाण्याची टाकी खोदलेली पाहायला मिळतात.
• अंधार कोठी :
गडावर एके ठिकाणी आपणास अंधार कोठी पाहायला मिळते. शत्रू व एखाद्या गुन्हेगारास शिक्षा देण्यासाठी त्यांचा वापर केला जात असे.
• राणीचा हुडा :
किल्यावर आपणास एके ठिकाणी बांधीव बांधकाम पाहायला मिळतें या ठिकाणास राणीचा हुडा असे म्हंटले जाते.
• रतनगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती:
• इसवी सनाच्या १३ व्या शतकात महादेव कोळी या जातीच्या सरदाराच्या ताब्यात रतनगड किल्ला होता.
• रतनगड हा इसवी सन १४०० साली बहामनी शासनाच्या ताब्यात होता.
• ई.स. १४०० मध्ये तो राजा नेमशहा याच्या ताब्यात आला.
• इसवी सनाच्या १४९०साली मलिक अहमद याने किल्ला जिंकून घेतला. व पुन्हा महादेव कोळी जातीच्या व्यक्तीची नेमणूक गडावर केली.
• इसवी सन १५९० साली मलिक अंबर याने निजामशाहीत हा किल्ला त्यावेळी असणारा किल्लेदार मिया मंजूस यास हरवून ताब्यात घेतला. व निजामशाहीत घेऊन पुन्हा महादेव कोळी जातीच्या व्यक्तीची नेमणूक केली.
• इसवी सन १६३० साली महादेव कोळी जातीचा सरदार व शहाजीराजे निजामशाही वाचवण्यासाठी मुघलांविरुढ एकत्र येऊन लढले. यामध्ये मुघल विजयी झाले. माहुलीचा तह झाला. या तहाने हा किल्ला मोगलांकडे गेला.
• इसवी सन १६६० मध्ये उत्तर मोहिमेत हा किल्ला स्वराज्यात जिंकून घेतला. महादेव कोळी जातीच्या सरदाराची नेमणूक केली.
• इसवी सन १६६४ साली सुरतेहून परत येताना शिवरायांनी या किल्ल्याचा काही काळ आश्रय घेतला होता.
• इसवी सन १६८८साली जव्हारच्या राजाच्या मदतीने कल्याण व नाशिकच्या मुघल सुभेदारांनी हा किल्ला मुघलांकडे जिंकून घेतला.
• इसवी सन १७२० छत्रपती शाहू महाराज यांनी हा किल्ला मराठा साम्राज्यात दाखल करुन घेतला.
• इसवी सन १७५० साली पेशवाई काळात राजूर प्रांतातील मुख्यालय रतनगड किल्ल्यावर नेण्यात आले.
व सुभेदार जावजी हिराजी बांबळे यांची नेमणूक करण्यात आली.
• इसवी सन १७९० मध्ये हा किल्ला जावजी बांबळे यांचा मुलगा हिरोजी किल्लेदार असताना देवगाव येथील देशमुख व नाईक यांनी बंड केले व किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला.
• इसवी सन १८१३ साली रामजी भांगरे हे राजूरचे सुभेदार असताना रतनगड किल्यावर गोविंदराव खाडे या किल्लेदाराची नेमणूक केली.
• इसवी सन १८१८ साली तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर इंग्रज विजयी झाले. व त्यांचा कॅप्टन ग्वाडर्ड याने या किल्याचा किल्लेदार गोविंदराव खाडे याचा पराभव केला. व किल्ला जिंकला.
• इसवी सन १८२० साली कृष्णराव यांनी पुन्हा बंड करून किल्ला घेण्याचा प्रयत्न केला पण कॅप्टन म्यान्किरोश यांनी बंड मोडून काढले.
• तेथून पुढे हा किल्ला ब्रिटीश राजवटीत दाखल झाला.
• पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.