सामानगड किल्ला माहिती मराठी
Samangad Fort information in marathi
एखाद्या किल्ल्यावरील लढवय्या सैनिकांना लढण्यासाठी लागणारी शस्त्रे, दारूगोळा सुरक्षित ठेवण्यासाठी एक सुरक्षित जागा असते. ती त्या राज्यात व त्या किल्याच्या परिसरात महत्वाची संरक्षक जबाबदारी घेते. तसेच शिवकाळात कोल्हापूर विभागात रांगणा, भुदरगड, पन्हाळा, विशाळगड यांना शस्त्रे व दारूगोळा पुरविण्याचे साधन म्हणजे सामान गड किल्ला ( Samangad Fort) होय.
![]() |
सामानगड किल्ला माहिती व इतिहास Samangad Fort information in marathi |
म्हणून म्हणतात,
• छत्रपती शिवराय व समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला सामानगड.
• प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला म्हणजे सामानगड.
• इंग्रजांविरुद्ध बंडाचे पहिले निशाण फडकवत स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या गडकरींच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला म्हणजे सामानगड.
• भुदरगड, रांगणा, विशाळगड, पन्हाळा, या सारख्या गडांन शस्त्रे व दारुगोळा व इतर रसद पुरवठा करणारा किल्ला सामानगड.
- सामानगड स्थान :
भारत देशातील, महाराष्ट्र राज्यातील, कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्यात नेसरी गडहिंग्लज रोड वरील चिंचेवाडी गावाजवळील सह्याद्रीच्या उप डोंगररांगेत सामान गड किल्ला वसलेला आहे.
- उंची :
सामानगड किल्याची उंची ही समुद्र सपाटी पासून २९७२ फूट आहे.
- सामानगडाला जायचे कसे :
• कोल्हापूरहून गडहिंग्लज तेथून नेसरी रोडवरून नेसरीला जाताना १० किलोमीटर अंतरावरील चिंचेवाडी गावातील मुख्य चौकातून पुढे डांबरी सडकेने पुढे सामानगडावर जाता येते. हे अंतर साधारण ८० किलोमीटर भरेल.
• नॅशनल हायवे नंबर चार वरील संकेश्र्वर – गडहिंग्लज – नेसरी रोड – चिंचेवाडी मार्गे – सामानगड.
* गडहिंग्लज पासून चिंचेवाडी १० किलोमीटर अंतरावर आहे.
• सामान गडावर तसेच परिसरात पहाण्यायोग्य ठिकाणे :
दर्शनी बुरुज, झेंडा बुरुज, वेताळ बुरुज, भवानी मंदिर, साखर विहीर, सात कमानी विहीर, अंधार कोठडी, चोरखिंड, भूमीगत हौद, मुघल टेकडी,
परिसरातील ठिकाणे :
हनुमान टेकडी मंदिर, भिमसासगिरी टेकडी.
हनुमान मंदिर व श्री रामचंद्र रहिवास शिवमंदिर मंदिर इ.
स्पष्टीकरण :
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात असणाऱ्या गडहिंग्लज ते नेसरी गावा दरम्यान असणाऱ्या चिंचेवाडी गावातून आपण जेव्हा सामानगडाकडे जातो. तेव्हा या ठिकाणी पराक्रम गाजवलेल्या त्या शिवरायांच्या सात मावळ्यांचा पराक्रम आठवतो. स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या पराक्रमाची आठवण येते. या प्रतापराव गुर्जर यांचे वास्तव्य या सामानगड किल्याच्या परिसरात त्या बहलोलखाना विरुध्द काढलेल्या अंतिम मोहीमेवेळी होते.
स्वराज्यावर चालून आलेला बहलोलखान जेव्हा प्रतापराव गुजर यांच्या सैन्याच्या कचाट्यात सापडला. तेव्हा तो शरण आला. व प्रतापराव गुजर यांनी त्याला शरण आल्यावर सुरक्षित विजापूरकडे जाऊ दिले. ही बातमी शिवरायांना समजताच त्यांनी कडक शब्दात प्रतापरावांचा समाचार घेतला. त्यामुळे चिडून जाऊन फक्त सात विरांना घेऊन प्रतापराव गुजर बहलोलखानावर चालून गेले. गेे यामध्ये ते सात वीर धारातीर्थी पडले ती नेसरीची खिंड या सामानगडापासून काही किलोमीटर अंतरावर आहे. त्या आठवणी घेऊन डांबरी सडकेने आपण सामान गडाकडे जाताना गडावर चढत असताना प्रथम एक बुरूज लागतो. नालाकृती वळण असलेला सुरेख बुरुज भक्कम अशा स्थितीत आहे. आजही इतिहासाच्या पाऊलखुणा घेऊन. तो आहे दर्शनी बुरुज.
झेंडा बुरुज :
गडावर आल्यावर किल्याच्या तटबंदीवरून पुढे गेल्यावर आपणास एक ध्वज स्तंभ लागतो. तो एका बुरुजावर आहे.
हा स्तंभ ब्रिटिशांनी बनवला ज्यावेळी त्यांनी या किल्याचा ताबा घेतला. त्यावेळी या ठिकाणी त्यांनी हा ध्वज स्तंभ उभा केला. तो जिथे उभा आहे. तो आहे झेंडा बुरुज.
भुयारी धान्य कोठी :
झेंडा बुरुज पाहिल्यावर आपण थोडे पुढे चालत गेल्यावर आपणास भूमिगत असणारी धान्य कोठारे लागतात. सामानगड हा रसद पुरवठा करणारा किल्ला असल्याने तिथे रसद ठेवण्यासाठी अनेक भुयारी कोठ्या केल्या होत्या.
वेताळ बुरुज :
सह्याद्री पर्वतातील उपरांगेत हा किल्ला येतो. त्यामुळे भक्कम संरक्षक असे या किल्यास अनेक बुरुज बांधले आहेत. ते एकूण दहा आहेत. त्यातील एका बुरुजाचे नाव वेताळ बुरुज असे आहे.
भवानी माता मंदिर :
गडाच्या मध्यभागी भवानी देवीचे मंदिर आपणास पाहायला मिळते. आजकाल या मंदिराचा जिर्णोद्धार केला गेल्याचे दिसते. मंदिरात सुरेख काळया पाषाणात बनवलेली भवानी देवीची मूर्ती आपणास गाभाऱ्यात पाहायला मिळते.
साखर विहीर :
मंदिराच्या पुढील बाजूस चौकोनी धाटणीची एक विहीर आपणास पाहायला मिळते. ती आहे साखर विहीर. तसे एक दोन विहिरी आणखी पाहायला मिळतील.
सातकमानी विहीर :
इतर कुठेही पाहिली नसेल अशी वेगळ्या धाटणीत बांधलेली एक एकामागून एक अशा सात कमानी असणारी विहीर आपणास इथे पाहायला मिळते. सुरेख पायऱ्या असणारी व भरपूर पाणी देवून किल्ल्यावरील तहानलेल्यांची गरज भागवण्यासाठी बांधली गेलेली ही विहीर. एकामागून एक चारी असणारी व वरती कमानी असणारी जीच्या आत जसजसे उतरत जावे तसतसे आतील बाजूस वेगवेगळ्या प्राण्यांची नक्षी कोरलेली पाहायला मिळते. या विहिरीचा तळ अजून लागलेला नाही. खूप खोल अशी विहीर आहे.
अंधार कोठडी :
सामान गडावर एक भूमिगत भुयारी खोली आपणास पाहायला मिळते. या ठिकाणी युद्ध कैदी तसेच गुन्हेगारांना डांबून ठेवले जात असे.
पुर्व दरवाजा :
गडाच्या पूर्व बाजूस उत्खनन करते वेळी आपणास गडाच्या पूर्व दरवाजाचे भग्न अवशेष पहायला मिळतात. खालील उंबरा तेवढा सुस्थितीत आहे. अवशेषावरून या ठिकाणी असणारा दरवाजा किती भक्कम होता याची कल्पना येते.
चोरखिंड :
गडाच्या तटावरून फिरत उत्तरेस आल्यावर आपणास तिथे एक चोरवाट देखील पाहायला मिळते. या ठिकाणाहून गडावर संकट काळात रसद पुरवठा. तसेच गड शत्रूने ताब्यात घेतल्यास गडावरील कुटुंब, कबिला व मावळ्यांना सुरक्षित बाहेर पडणेसाठी त्याचप्रमाणे गनिमी कावा युद्धतंत्र वापरणेसाठी चोर दरवाजा ठेवलेला पाहायला मिळतो.
सोंडी बुरुज :
गड हा पूर्वेकडे निमुळता होत गेलेला आहे. या बाजूला हत्तीच्या सोंडेच्या अकारासारखा बुरुज आपणास पाहायला मिळतो. त्याचे नाव सोंडी बुरुज आहे.
मुघल टेकडी :
सोंडी बुरुजाच्या समोर आपणास एक टेकडी पाहायला मिळते. सामानगड जिंकण्यासाठी त्याकाळी मुघल सैन्यानी या ठिकाणी श्रमदान करून एक टेकडी उभा केली. तो आहे मुघल टेकडी क्षण.
• गड तटावर जागोजागी आपणास जंग्या पाहायला मिळतात. त्यातून बाहेरील बाजूस निरीक्षण करून निशाणा साधता येत असे. संकटकाळी शत्रूला यातून टिपता येत असे.
• सामानगड पाहून झाल्यावर आहे त्या वाटेने परत जाताना आपणास भीमसासगिरी डोंगरातील हनुमान मंदिराकडे जाणारा पायरीमार्ग पाहायला मिळतो. त्या मार्गाने आपण पुढे चढून गेल्यावर ६५ हेक्टर अवार पाहायला मिळतो. अत्यंत सुंदर शांत असा हा परिसर आहे.
• हनुमान मंदिर :
अत्यंत रमणीय असा हा परिसर असून या ठिकाणी सुंदर असे हनुमान मंदिर आहे. या मंदिराची पूनरबांधणी झाली असून आतील गाभाऱ्यात सुरेख काळया पाषाणाची हनुमंत मूर्ती पाहायला मिळते. मंदिर समोर सुरेख दीपमाळा पाहायला मिळतात. हा शांत असा परिसर मनाला वेगळीच शांती देवून जातो.
शिव मंदिर :
हनुमान मंदिराच्या पुढील बाजूस खोल जमिनीत खोदून बनवलेले सुंदर शिव मंदिर पाहायला मिळते. हे त्रेतायुग काळातील असून या ठिकाणी प्रभू श्री राम, लक्ष्मण व माता सितेचा वास होता. हे मंदिर एखाद्या वाड्यासारखे वाटते. प्रथम पायरी मार्गाने खाली मंदिरात उतरून आल्यावर आपणास प्रतीक्षागृह लागते. प्रतीक्षागृहाच्या पुढे एक छोटा स्तंभ आहे. त्यावर अनेक शिवपिंडी पाहायला मिळतात. त्या पुढे एक तळघर आहे. त्यामध्ये एक शिवलिंग असून त्या तळघराच्या वरील बाजूस श्री राम मंदिर आहे.
मुख्य मंदिर परिसरात अनेक छोटी छोटी मंदिरे पाहायला मिळतात. यामध्ये ज्ञानेश्वर मंदिर आहे. त्या जवळील बाजूस छोट्या छोट्या देवळ्या आहेत त्यांमध्ये बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना केली आहे.
• औदुंबराच्या झाडाखाली दत्त मंदिर असून बारा ज्योतिर्लिंगाच्या बाजूला एक यज्ञकुंड पाहायला भेटतो.
त्यानंतर समोरील बाजूस शनी देवतेचे मंदिर लागते. त्याच्या बाजूला कैलास मंदिर असून या कैलास मंदिराच्या मागील बाजूस आपणास प्रभू रामचंद्रांची बैठक पाहायला मिळते. त्यापुढील बाजूस लक्ष्मण कोठी लागते. त्यापुढे स्वयंपाकघर असून त्या जवळील बाजूसमागे प्रभू राम यांचा शयनकक्ष लागतो. असा हा शांत निर्मळ परिसर आपणास या ठिकाणी पाहायला मिळतो. अशा या पुण्य पावन भूमीत आल्यावर मनाला शांती लाभते.
सामानगडाची ऐतिहासिक पार्श्वभुमी :
• त्रेतायुगात या परिसरात प्रभू रामचंद्र, सितामाता व लक्ष्मण यांचं वास्तव्य होते.
• त्यानंतर शिलाहार राजा भोज दुसरा याच्या कारकीर्दीत या ठिकाणी सामान गडाचे प्रथम बांधकाम केले गेले होते.
• त्यापुढे हा किल्ला बहामनी सुलतानाच्या राजवटीत होता.
• बहामनी सत्तेचे विभाजन झाल्यावर हा किल्ला आदिलशाहीकडे आला.
• इसवी सन १६६७ साली छत्रपती शिवराय यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला.
• स्वराज्यातील अष्टप्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो सचिव हे या दक्षिण सुभ्याचे कामकाज पहात होते. यांनी आपल्या अखत्यारीत या किल्याची डागडुजी व काही बांधकाम करून घेतले. असे मानले जाते.
• इसवी सन १६८८ साली हा किल्ला मुघलांनी जिंकून घेतला.
• इसवी सन १७०१ साली हा किल्ला पुन्हा मराठा राज्यात दाखल करून मराठ्यांनी घेतला.
• त्यानंतर काही अवधीत शाहजादा बेदार बख्त याने पुन्हा वेढा देवून हा किल्ला परत जिंकला. व शहामिर यास किल्लेदार केले.
• इसवी सन १७०४ साली सामानगड किल्ला पुन्हा स्वराज्याच्या सेवेत आला.
• वारणा तहानंतर हा किल्ला महाराणी ताराबाई यांच्य करवीर राज्यात दाखल झाला.
• पुढे हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.
• इसवी सन १८४४ साली झालेल्या किल्ल्यावरील गडकर्यांच्या बंडात सामानगडावरील गडकऱ्यांचा देखील समावेश होता.
• या बंडात मुंजाप्पा कदम यांनी नेतृत्व केले. त्यांच्या सोबत ३५० गडकरी,१० तोफा, १०० बंदूकधारी बारवाले व २०० सैनिक होते. यांनी एकजुटीने इंग्रजांचे आक्रमण दोन वेळा परतवले.
• शेवटी १३ ऑक्टोंबर १८४४ साली सामानगड इंग्रजानी ताब्यात घेतला. गडकाऱ्यानी पुन्हा बंड करू नये म्हणून इंग्रजांनी तोफेच्या साहाय्याने पूर्व दरवाजा तसेच तट बंदीची तोडफोड केली. हल्ली या किल्यावरील बांधकाम गडहिंग्लजचे आमदार बाबासाहेब कुपेकर यांनी आमदार फंडातून केले आहे.
• प्रतापराव गुजर बहलोल खानाविरुध्द मोहिमेवर गेले असताना या ठिकाणी वास्तव्यास होते.
अशी आहे सामानगड किल्ल्याची माहिती व इतिहास.
Samangad Fort information in marathi and Histri.