अजिंक्यतारा किल्ल्याची माहिती
Ajinkyatara Fort information in marathi
भारत देशातील महाराष्ट्र राज्यात सह्याद्री पर्वताच्या श्रृंखलेत सातारा जिल्ह्यातील सातारा शहरातील एक गिरिदुर्ग म्हणजे अजिंक्यतारा होय.
![]() |
अजिंक्यतारा किल्ल्याची माहिती Ajinkyatara Fort information in marathi |
• हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून हा किल्ला ओळखला जातो. प्रथम राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड, तिसरी राजधानी जिंजी तर चौथ्या राजधानीचा मान हा अजिंक्यतारा किल्यास जातो. महाराणी ताराबाई यांच्या काळात या किल्यास राजधानीचा मान मिळाला होता
• अजिंक्यतारा हा किल्ला सातारगड, सप्तर्षीगड, सातारचा किल्ला, आझमतारा, अजिंक्यतारा या नावाने ओळखला गेला आहे. आज त्यास अजिंक्यतारा म्हणतात.
• स्थान :
प्रतापगड किल्ल्यापासून सह्याद्री पर्वताची एक रांग सातारा शहराच्या बाजूला पसरली आहे. तिला स्थानिक लोक बामणोली रांग या नावे ओळखतात. याच रांगेत सातारा शहराजवळील उंच डोंगरात अजिंक्यतारा किल्ला वसलेला आहे.
उंची :
अजिंक्यतारा किल्ल्याची उंची ही समुद्रसपाटीपासून ४४०० फूट म्हणजेच १००६ मीटर आहे. व या किल्याचा दक्षिणोत्तर विस्तार ६०० फूट आहे.
• अजिंक्यतारा किल्यावर जाण्यासाठी प्रवासी मार्ग :
• हा किल्ला सातारा जिल्ह्यात व शहरात असल्याने येथे जमीनीच्या मार्गे वेगवेगळ्या रस्त्याने, रेल्वेने हे शहर जोडले गेले आहे.
• मुंबई – पुणे – सातारा – अजिंक्यतारा.
• बेंगलोर – बेळगाव – कोल्हापूर – सातारा – अजिंक्यतारा.
• सातारा शहरातून गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत आपणास गाडीने जाता येते.
• सातारा शहरातील साईबाबामंदिरा पासून तसेच चारभिंती या ठिकाणाहून आपण अजिंक्यतारा किल्यावर जाता येते.
• कराड सातारा या राष्ट्रीय महामार्गावरून एक फाटा अजिंक्यतारा किल्याच्या उत्तर दरवाजावरुन येणाऱ्या हमरस्त्याला जाऊन मिळतो. येथून गडावर जाता येते.
• इथून जवळील विमानतळ हा पुणे तसेच कोल्हापूर आहे. पुणे येथून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा चालते. कोल्हापूर येथून काही खाजगी विमानसेवेमार्गे राष्ट्रीय वाहतूक होते. येथून रस्त्याने सातार्याला जाता येते.
• अजिंक्यतारा किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
• महादरवाजा :
सातारा शहरातील अदालत वाड्या पासून एक रोड हा गडावर जाणाऱ्या मार्गास जाऊन भेटतो. त्या मार्गाने पुढे गेल्यावर आपण गडावरील महाद्वाराच्या जवळ जाऊन पोहोचतो. हा भव्य असा कमानाकृती दरवाजा आहे. अजूनही सुस्थितीत असून. याची बांधणी मजबूत ,अन् विस्तारित आहे. यास एक चोरटा दरवाजा देखील आहे. ज्यातून आत जाता येते. दरवाजावरील चौकटीवर सुरेख अशी नक्षी तसेच हनुमंत, गणेश या देवतांची शिल्पे कोरलेली दिसतात. आतील बाजूस देवड्या असून त्या तत्कालीन पहारेकऱ्यांसाठी विश्रांती घेण्यासाठी बांधलेल्या दिसतात. दरवाजावरील छत घुमटाकार आहे. एका बाजूस बुरुज तर दुसऱ्या बाजूस भक्कम कडा आहे. दरवाजा अत्यंत बळकट अशा लाकडाने बनवलेला असून जागोजागी मजबुतीसाठी लोखंडी खिळे वापरले आहेत. या दरवाजाची उंची पाहता एखादा हत्ती किंवा उंट देखील अंबारीसह आत जाऊ शकतो.महादरवाज्यातील पहारेकरी देवड्याखाली आपणास शिल्पकला पाहायला मिळते. ज्यामध्ये पक्षी, स्त्रिया, लढाई करणारे योद्धे, सैनिक, मल्ल अशी शिल्पे पाहता येतात.
• दरवाजाच्या आत पायरी मार्ग असून त्या चढून गेल्यावर तटबंदीवर तसेच दरवाजावरील भागावर जाता येते.
• दुसरा दरवाजा :
किल्याचा मुख्य दरवाजा झाल्यावर दुसरा दरवाजा लागतो. उंच कमानाकृती असणारा हा दरवाजा थोडा दुर्लक्षित आहे. पण हा सुरक्षेसाठी बांधला गेला असावा.
• पायरी मार्गाने चढून गडावर आल्यावर आपणास एक छोटेसे महादेवाचे मंदिर लागते. या ठिकाणी शिवपिंड व नंदी पाहायला मिळतो.
• हनुमान मंदिर :
महादेव मंदिराच्या मागील बाजूस हनुमंताचे मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार केला असून बाहेरील बाजूस खुला मंडप असून आतील बाजूस काळया पाषाणात हनुमंताची मूर्ती पाहायला मिळते. हा उत्तराभिमुख हनुमंत आहे.
• सात पाण्याची तळी :
अजिंक्यतारा किल्यावर आपणास लहान मोठी अशी सात पाण्याची तळी आहेत. ही पावसाळी दिवसात भरलेली असून. उन्हाळ्यात बरीचशी कोरडी होतात.
• महाराणी ताराबाईंचा वाडा :
गडावर एक भग्न अवस्थेत वाडा पाहायला मिळतो. आजकाल याची दुरावस्था झालेली पाहायला मिळते. राजाराम महाराजांच्या नंतर या ठिकाणी राहून महाराणी ताराबाई यांनी बराच काळ मराठा स्वराज्याचे नेतृत्व केले. आजही या वास्तूचे भग्न अवशेष त्या काळातील वैभवाची साक्ष देतात.
• ताराबाई राजवाड्याच्या बाजूला एक धान्य कोठार होते. ज्या ठिकाणी धान्य ठेवलं जात असे. जे किल्यावरील तत्कालीन शिबंदीतील लोकांची अन्नाची गरज भागवत होते.
• सदर व बालेकिल्ला अवशेष :
राजवाड्या शेजारी आपणास सदरेचे व बालेकिल्ल्याचे दगडी अवशेष पहायला मिळतात. ज्या ठिकाणी सभा भरून राज्यातील समस्येवर खुली चर्चा होत असे.
• मंगळाई देवीचे मंदिर :
गडावर मंगळाई देवीचे मंदिर पाहायला मिळते. या मंदिराचा देखील जीर्णोद्धार केला गेला असून बाहेर खुले सभामंडप असून मंदिराच्या आत सुरेख मंगळाई देवीची मूर्ती पाहायला मिळते. मंगळाई देवीच्या मंदिर आवारात आपणास अनेक विरगळी , मुर्त्या, तसेच समाध्या जुन्या मुर्त्या पाहायला मिळतात.
• मंगळाई बुरुज :
मंगळाई देवीच्या मंदिरा जवळच किल्याचा एक बुरुज असून त्यास मंगळाई बुरुज असे म्हंटले जाते. मुघलांच्या स्वारीवेळी हाच बुरुज आतमध्ये घुसणाऱ्या मुघल सैन्यावर कोसळला होता.ज्यात मुघलांच्या सैन्याचे बरेच नुकसान झाले.
• चुन्याची घाणी :
गड किल्याचे बांधकाम करण्यासाठी चुन्याचा वापर दगड सांधण्यासाठी केला जात असे. त्यासाठी चूना निर्माण करण्याची घाणी येथे पाहायला मिळते.
• धान्य कोठारे (जमिनीखालील रांजणे):
किल्यावर जमिनीखाली धान्य तसेच इतर साठा करण्यासाठी रांजणे खोदलेली दिसतात. ज्यामध्ये धान्य साठा केला जात असे.
• रखमेश्वर महादेव मंदिर :
गडावर आणखी एक छोटेसे महादेव मंदिर आहे. या मंदिरात एक शिवपिंड असून समोर लहान नंदी आहे.
• प्रसार भारती केंद्र:
गडावर प्रसार भारती केंद्र देखील पाहायला मिळते. या ठिकाणावरून सातारा १०३.५ या आकाशवाणीचे प्रसारण होते.
• सप्त ऋषी महादेव मंदिर :
गडावर सप्त ऋषी महादेव मंदिर देखील पाहायला मिळते. जे एका तळ्याच्या काठी आहे. बाहेरील बाजूस नंदी तर आतील बाजूस शिवलिंग पाहायला मिळते. तसेच गणेश, हनुमान, देवतेची व एका कोपऱ्यात स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार पिरोबा देवतेची मूर्ती देखील पाहायला मिळते.
दक्षिण दरवाजाकडे जाताना आपणास पोलीस चौकीपण लागते.
• दक्षिण दरवाजा :
किल्याच्या दक्षिणेस देखील एक भव्य दरवाजा पाहायला मिळतो. ज्याची बांधणी अन्य दरवाजा सारखीच आहे. तसेच हल्ली सह्याद्री प्रतिष्ठान या गडसंवर्धन ग्रुपने या ठिकाणी भव्य दरवाजे बसवले आहेत. या दरवाजाकडे येताना वाटेत तळी लागतात.
• अजिंक्यतारा किल्याबाबत ऐतिहासिकदृष्ट्या माहिती:
• अजिंक्यतारा या किल्ल्याचे बांधकाम प्रथम शिलाहार राजा दुसरा भोज याने इ. स. ११९० साली केले.
• त्यानंतर हा किल्ला अल्लाउद्दीन खिलजी याच्या ताब्यात आला.
• अल्लाउद्दीन खिलजी नंतर हा किल्ला बहमनी सुलतानाच्या राजवटीखालील सत्तेत होता.
• बहमनी राजवटीनंतर हा किल्ला आदिलशाहीत गेला.
• त्यानंतर या ठिकाणी अहमदनगरची निजामशाही वारसदार चांदबीबी, जी पहिल्या आदिलशहाची पत्नी होती तिला इस १५९० साली कैद करून ठेवले होते.
• २७ जुलै १६७३ ला हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला.
• डिसेंबर १६७६ ते जानेवारी१६७७ मध्ये असे दोन महिने तापाने(ज्वराने) आजारी असल्याने छत्रपती शिवराय या ठिकाणी आराम करण्यासाठी राहीले होते.
• छत्रपती राजाराम महाराज यांनी औरंगजेब बादशहा चालून स्वराज्यावर आला तेव्हा इस १६९८ साली अजिंक्यतारा किल्ल्यावर राजधानी स्थापन केली. महाराणी ताराबाई यांनी छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्युनंतर येथून काही वर्षे मराठी राज्याचा कारभार पहिला.
• इस १६९९ साली औरंगजेबाच्या फौजेने अजिंक्यतारा दुर्गाला वेढा दिला. किल्लेदार प्रयागजी प्रभू याने गड लढवाला. १३ एप्रिल १७०० रोजी मुघलांनी किल्याच्या बुरुजाखाली दोन भुयारे खोदून त्यात दारूगोळा भरला. मंगळाई बुरुजाखाली लावलेल्या बत्तीने बुरुज उडाला व बुरुजावरून मराठे धारातीर्थी पडले. पडलेल्या बुरुजातून मुघल सैन्य आत घुसताना दुसरा सुरुंग फुटला व बुरुज मुघल सैन्यावर कोसळला. यामध्ये २५०० मुघल सैन्य ठार झाले
• किल्ल्यावरील दानागोटा संपल्याने किल्लेदार प्रयागजी प्रभू यांनी किल्ला मुघलांच्या हाती सोपवला.
• मुघल बादशहा औरंगझेब याने आझमतारा असे नामांतरण केले.
• महाराणी तारबाईंच्या सैन्याने पुन्हा जिंकला. पण मुघलांनी परत ताब्यात घेतला
• छत्रपती शाहू यांनी मुघल सरदारास फितवून हा किल्ला परत इसवी सन १७०८ साली ताब्यात घेतला. व या ठिकाणी छत्रपती शाहूंचा राज्याभिषेक करण्यात आला.
• इस १७१९ साली महाराणी येसूबाई यांची मुघलांच्या नजरकैदेतून सुटका झाल्यावर याच किल्यावर प्रथम आणले गेले.
• अजिंक्यतारा किल्याच्या परिसरात छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा शहर वसवले.
• इसवी सन १८१८ साली हा किल्ला मराठा साम्राज्याच्या र्हासानंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला.
अशी आहे अजिंक्यतारा किल्ल्याची माहिती
Ajinkyatara Fort information in marathi
No comments:
Post a Comment
यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l