१) रायगड किल्ला ( धर्तीवरच स्वर्ग) Raigad Fort information in marathi
रायगड किल्ला धर्तीवरच स्वर्ग
Raigad Fort information in marathi
महाराष्ट्र राज्यातील एक गिरिदुर्ग, जो अभेद्य असा आहे. व स्वराज्य व स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.
![]() |
रायगड किल्ला ( धर्तीवरच स्वर्ग) Raigad Fort information in marathi |
स्थान :
महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या सह्याद्री पर्वतात महाड शहरापासून काही अंतरावर स्थित याची समुद्र सपाटी पासून उंची सरासरी ८२० मीटर आहे.
राजगड ही पूर्वी मराठा राज्याची राजधानी होती. पण स्वराज्याच्या शत्रूच्या ताब्यात जवळील किल्ले कोंढाणा गेला. त्यामुळे ती राजधानी असुरक्षित वाटू लागल्याने, राजधानीचे ठाणे सुरक्षित करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी रायगडाची निवड केली.
स्वराज्यात येण्यापूर्वी रायगड:
स्वराज्यात समाविष्ट होण्यापूर्वी रायगड हा जावळी खोऱ्यातील त्या काळातील आदिलशाही सरदार यशवंतराव मोरे यांच्या ताब्यात होता. तेव्हा त्याचे नाव रायरी होते. यशवंतराव मोऱ्यांनी शिवरायांच्या स्वराज्याच्या धोरणास विरोध केला त्यामुळे शिवराय चिडले व त्यांनी मोऱ्यांविरुढ लष्करी कारवाई करून हा किल्ला व जावळीचा मुलुख ताब्यात घेतला. व पुढे याचे महत्त्व जाणून याची राजधानी योग्य रचना शिवरायांनी करून घेतली.
रायगडला जाताना पाचाड पासून चित्त दरवाजा एक किलमीटरच्या अंतरावर आहे. या दरवाज्याची मोडतोड झाली आहे. इथून पुढे पायऱ्यांनी चढत जावे लागते. जवळ जवळ १४२५- ३० पायऱ्या या गडाला असाव्यात.
महादरवाजा रायगड:
या पायऱ्या चढून वर गेल्यावर पुढे महादरवाजा लागतो. महादरवाजा जवळील बुरुजाचे बांधकाम हे गोमुख पद्धतीचे आहे. गोमुख म्हणजे गाय वासराला दूध पाजताना वळून पाहते व चाटते. ते दृश्य, त्या पद्धतीचे बांधकाम, याचा फायदा असा होता की शत्रूने कितीही तोफांचा मारा केला तरी तो बुरुजावर बसे अन् दरवाजा सुरक्षित राहत असे. तसेच दरवाजा तोडताही येत नसे. कारण सैन्याना म्हणावा तितका वेग घेऊन हल्ला करणे अवघड होते. तसेच या दरवाजावर दोन्ही बाजूस कमळाकृती कोरलेल्या आहेत. त्या लक्ष्मी व विद्यादेवीची प्रतीके मानलेली आहेत. म्हणजे योग्य बुध्दीच्या बळाने लक्ष्मीची प्राप्ती' होऊन त्या सदैव येथे स्वराज्यात विराजमान व्हाव्यात. या दरवाजा जवळील विशाल बुरुज एखाद्या शस्त्रधारी मावळ्याप्रमाणे या दरवाजाचे रक्षण करतात. या दरवाजातून आत गेल्यावर तिथे पहारेकर्यांना रहाणेस छोटीशी जागा म्हणजे देवड्या आहेत.
हत्ती तलाव :
महादरवाजातून पुढे गेल्यावर आपल्याला किल्ल्याचा वरील भागात जायला होत. तिथे हत्तीतलाव आहे. गजशाळेतील हत्तींना अंघोळ तसेच पाणी पिण्यासाठी हा तलाव बांधला गेला. येथील दगड बांधकामास वापरले गेले. व त्यातून निर्माण झालेल्या सखल भागात हा तलाव बांधला गेला. पावसाळ्यात पडणारे पाणी वाहून इथे येऊन साचते. व ते पुढे वर्षभर हत्ती तसेच घोड्यांना पुरते.
शिवकाळात राज्याभिषेक करण्यासाठी हत्ती आणले गेले होते. पण या गडावर चढून जाण्यास दमछाक होते. तेव्हा तत्कालीन परदेशी इंग्रज अधिकाऱ्यांना हे हत्ती इथे कसे आणले असतील हा प्रश्र्न पडला. तेव्हा तत्कालीन मावळ्याने दिलेले उत्तर रोमहर्षक आहे, की ,हत्तीची लहान पिल्ले पूर्वीच इथे आणली गेली. व त्यांचा इथे सांभाळ केला गेला. तेच हे हत्ती आहेत. ज्यांचा उपयोग राज्याभिषेकाच्या वेळी केला गेला. यावरून महाराजांची दूरदृष्टी दिसून येते. की ते कोणत्याही कामकाजात दूरदृष्टीने विचार करत असत.’
शिरकाई देवी मंदिर :
हत्ती तलावापासून वर चढून आल्यावर आपल्याला एक छोटेसे मंदिर पहावयास मिळते. ते देवी शिरकाईचे मंदिर आहे. शिर्के हे या गडाची देखरेख करणारे. जुने राखणदार त्यांची देवी ती ‘शिरकाई' तिचे मंदिर लागते. तसे पाहता होळीच्या माळावर जुने एक छोटेखानी मंदिर लागते. त्याचा आता चबुतरा शिल्लक आहे. ते जुने शिरकाई मंदिर आहे.
बाजारपेठ :
शिरकाई मंदिरापासून पुढे गेल्यावर बाजारपेठेचे अवशेष लागतात. एका बाजूला बावीस अशी दोन्ही बाजूस मिळून चव्वेचाळीस दुकाने ती ही उंच ज्योत्यावर आहेत. बाहेरील बाजूस मोठे दालन व आतील बाजूस छोट्या छोट्या खोल्या साहित्य ठेवण्यासाठी. अशी रचना असणारी ही बाजारपेठ दोन्ही बाजूच्या रांगाच्या दुकानांच्या मधून विस्तृत असा रस्ता गेलेला दिसतो. दोन ते तीन ट्रक एकदम जाऊ शकतील असा चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे. शिवकाळात गडावर बाजार भरत असे. अनेक वस्तू, वस्त्रे, दागदागिने, अन्न धान्य,मसाले, व दैनंदिन जीवनात गरजेच्या वस्तूंची उलाढाल होत असे.
होळीचा माळ :
बाजार पेठे पासून पुढे एक विस्तृत असा पठारी माळ दिसतो. त्याला होळीचा माळ असे म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेस होळीच्या दिवशी येथे होळी पेटवली जायची छत्रपती शिवराय स्वतः त्या होळीत नारळ टाकायचे. व त्या वेळी असे जाहीर करत की जो कोणी या पेटत्या होळीतून नारळ काढून दाखवेल त्यास शिवराय सोन्याचे कडे बक्षीस देत. त्या काळी निधड्या छातीच्या जिगरबाज धर्मवीर युवराज संभाजीराजांनी तो नारळ पेटत्या होळीतून काढून दाखवला होता. याच ठिकाणी आपणास छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा पहावयास मिळतो.
दगडात कोरलेले भांडे
इथून पुढे काही पायऱ्या चढूण गेल्यावर नगारखान्यासमोर एक दगडात कोरलेले भांडे पाहायला मिळते. ते घोड्यांना पाणी पिण्यासाठी बनवलेले भांडे आहे. शिवरायांची एक घोडी होती. तिचे नाव कृष्णा होते. काही लोकांमते कल्याणी तिचे नाव होते. तिच्यासाठी खास हे भांडे खोदले होते. ती यातून पाणी पीत असे असे गाईड सांगतात.
नगारखाना :
पाण्याच्या भांड्याजवळ असणारी उंच अशी चिरेबंदी दरवाजा सारखी वास्तू आपल्याला दिसते. ती आहे नगारखाना. शिवकाळात सण समारंभ तसेच एखादी आनंदी घटना घडल्यावर इथे नगारे वाजवले जात असत. व एक प्रकारे रयते पर्यंत ती वार्ता पोहोचवण्याचे ते एक साधन होते.
राजदरबार/ राज्यसभा रायगड:
नगारखान्यातून आत गेल्यावर आपल्याला भव्य अशा राजदरबाराचे अवशेष पहायला मिळतात. २२० फूट लांब व १२४ फूट रुंद असा हा आवार आहे. या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. त्यावेळी बत्तीस मण सोन्याच्या सिंहासनावर राजे विराजमान झाले होते. सातवाहन व यादव घरण्यानंतर हिंदूंचा अधिकृत छत्रपती हा शिवरायांच्या रुपाने स्वराज्यासाठी लाभला होता. पूर्व दिशेला तोंड करून असणार्या या वास्तूतून स्वराज्याचा कारभार पाहिला गेला . या वास्तूची रचना अशी आहे की नगारखान्याजवळ हळू आवाजात जरी कुणी बोलले तरी ते सिंहासनापर्यंत ऐकू जाते. अशी सुरेख ध्वनी प्रसारक रचना येथे पाहायला मिळते.
राजदरबाराच्या व सिंहासनाच्या मागील बाजूस आपल्याला शिवकालीन अनेक वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. त्यांच्या रचनेत तत्कालीन वाड्यांच्या व खोल्यांच्या रचनेची कल्पना येते.
धान्य कोठार :
रायगडावर मोठी अशी दोन धान्याची कोठारे पाहायला मिळतात. किल्ल्याला वेढा पडला की वरील व्यक्तींना लागणारी अन्नाची गरज भागवण्यासाठी. तसेच गडावरील दैनंदिन अन्नाची गरज भागवण्यासाठी छत्रपती शिवरायांनी धान्य कोठारे बनवून घेतली होती.
सचिवालय :
बालेकिल्ल्याच्या जवळच विस्तृत अशी सचिवालयाची इमारत होती. इथून सर्व कारभाराचा लेखाजोखा ठेवला जात असे. आता तिथे फक्त अवशेष पहायला मिळतात.
गंगासागर तलाव :
खालील बाजूस एक तलाव आपल्याला पाहायला मिळतो. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा काशीचे पंडित गागाभट्ट यांनी पौरोहित्य केले. त्यावेळी सप्तनद्यांचे पाणी (सिंधू, गंगा, गोदावरी, कावेरी, नर्मदा, यमुना, कृष्णा) तसेच तिन समुद्राचे पाणी आणले गेले. राज्याभिषेक झाल्यानंतर उरलेले तीर्थ या तलावात टाकले गेले. तेव्हापासून या तलावास गंगासागर तलाव असे नाव पडले. गडावरील हा अखंड पाण्याचा स्त्रोत आहे. येथील पाणी कधीही संपत नाही.
सप्तमजली मनोरे :
गंगासागर तलावा शेजारी उंच असे मनोरे पाहायला मिळतात. हे सात मजली मनोरे होते. छत्रपती शिवराय जेव्हा एखादी मोहीम फत्ते करून येत तेव्हा त्या मनोऱ्यावर भगवा ध्वज फडकवला जात असे. नंतर इंग्रजांनी या मनोर्यांची नासधूस केली.
खलबत खाना/ गुप्त वार्ता खोली :
मनोऱ्याा पासून जवळच एक भूमिगत खोली आहे. तिला खलबतखाना म्हणतात. या ठिकाणी एखादी राजकीय, तसेच लष्करी वा अन्य गुप्तवार्ता केली जात असे. महत्वाचे प्रधानमंडळ, अधिकारी तसेच हेर व छत्रपती शिवराय तसेच विश्वासू सेवक यांमध्ये गुप्त वार्ता होत असे. यातून स्वराज्यावर आलेल्या संकटांवर चर्चा होई. तसेच त्यावर कोणते उपाय योजावे त्यासंबंधी चर्चा होत असे.
टाकसाळ :
मनोऱ्या जवळच पूर्व बाजूला एक मोकळी जागा आहे. तिथे शिवकालीन टाकसाळ होती. जिथे शिवकालीन सोन्याची व तांब्याची नाणी पाडली जात. त्या काळात सोन्याचा होण व तांब्याची शिवराई ही नाणी विशेषतः व्यवहारात असत.
राजवाडा : राजदरबाराच्या मागील बाजूस विस्तृत अशा खोल्यांचे अवशेष दिसतात ते त्या काळातील राजवाड्याचे अवशेष आहेत. याच ठिकाणी छत्रपती शिवरायांनी आपले शेवटचे क्षण घालवले. तसेच येथेच छत्रपती शिवरायांचे देहावसान झाले. व ३ एप्रील १६८० रोजी रयतेचा वाली गेला.
पालखी दरवाजा रायगड :
पालखी दरवाजातून राजे पालखीत बसून जात असतं. तेथून वर गेल्यावर मेना दरवाजा आहे तो राणीवस्याला लागून आहे. इथे महाराजांच्या राण्या व त्यांचे नोकर यांचे वास्तव्य होते. त्या बाहेर जाताना मेण्यात बसून जात. त्यासाठी मेणा दरवाजातून मेण्यात बसून त्यांचे येणे जाणे होत असे. म्हणून त्यास मेणा दरवाजा हे नाव पडले.
राणीवसा
छत्रपती शिवरायांच्या पत्नी व इतर चाकर यांसाठी इथे वेगवेगळ्या खोल्या होत्या. तसेच या ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते.
मेना दरवाजा :
राणीवस्याला लागुनच मेना दरवाजा आहे. इथूनच राजघराण्यातील स्त्रियांची मेण्यत बसून ये जा होत असे.
अष्ट प्रधान यांचे वाडे :
गडावर राज्यकारभार करण्यासाठी अष्टप्रधान व इतर मंडळी होती. त्यांच्या निवासाची सोय इथे केलेली होती. त्यांना व त्यांच्या कुटुंबाच्या राहण्यासाठी वाडे बांधलेले होते. त्यांचे अवशेष राजवाड्याजवळच एका बाजूस पाहायला मिळतात.
कुशावर्त तलाव :
होळीच्या माळाने उजव्या बाजूच्या वाटेने पुढे गेल्यावर कुशावर्त तलावाकडे एक वाट जाते. त्या ठिकाणी एक छोटेसे शिव मंदिर आहे. त्या पुढे भग्न अवस्थेत असणारा नंदी आपणास पहावयास मिळतो.
वाघ दरवाजा :
कुशावर्त तलावाच्या पुढील बाजूने एक अरुंद घळी लागते. तिथून पुढे एक दरवाजा लागतो त्यास वाघ दरवाजा म्हणतात. हा चढून येणे जवळ जवळ अवघड. मात्र इथून खाली उतरताना दोरखंडाच्या साहाय्याने खाली उतरावे लागते. मुघलांच्या वेढ्यातून निसटून जाण्यासाठी या दरवाजाचा वापर त्या काळात केला गेला.
हिरकणी बुरूज :
गंगासागर तलावाच्या उजव्या बाजूने पश्चिम दिशेला एक अरुंद वाट जाते. ती थेट हिरकणी बुरुजाकडे, हे ठिकाण हिरकणी या गवळणी मुळे प्रसिद्ध झाले. या बाजूने एक गवळण हिरकणी आपल्या लेकरांच्या ओढिने गड उतरून खाली गेली होती. त्या ठिकाणी शिवरायांनी बुरुज बांधला. तोच हा हिरकणी बुरुज. या बुरुजाच्या तोफेच्या माऱ्याच्या टप्प्यात अनेक ठिकाणे येतात. हे युद्ध दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे.
टकमक टोक :
बाजार पेठेच्या जवळून पुढे उतार उतरून गेल्यावर आपल्याला बाजूस काही अवशेष दिसतात. ते दारूगोळा कोठाराचे अवशेष आहेत. तिथून पुढे एक अरुंद रस्ता लागतो. त्याच्या उजव्या बाजूला खोल व अरुंद असा कडा लागतो तेथून चालत पुढे गेल्यावर आपल्याला एक कड्याचे टोक लागते. ते म्हणजे टकमक टोक होय. या ठिकाणाहून स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या, तसेच फितूर झालेल्या गुन्हेगारांना या ठिकाणाहून कडेलोट केला जात असे. हे एक शिक्षा देण्याचे ठिकाण होते.
जगदीश्वर मंदिर :
बाजार पेठेच्या खालील बाजूस पुढे चालत गेल्यावर जगदीश्र्वराची पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांच्या वाड्याचे तसेच ब्राह्मण वस्तीचे अवशेष पहावयास मिळतात. तेथून पुढे गेल्यावर एक विशाल असे जगदीश्वर मंदिर लागते. या मंदिराच्या आवारात एक नंदी आहे. त्याची थोडी तोडफोड झाली आहे. सुंदर सभामंडप अजूनही चांगल्या स्थितीत आहे. सुंदर कासव त्यापुढे गाभारा व गाभाऱ्यात सुरेख अशी जगदीश्वराची म्हणजेच शिवशंभूची पिंड पाहायला मिळते. या मंदिर प्रवेशद्वाराच्या पायरीवर एक शिलालेख आहे. तो म्हणजे सेवेशी तत्पर हिरोजी इंदळकर. संपूर्ण रायगडाची बांधणी करणारे हिरोजी इंदळकर यांना शिवरायांनी गडाच्या बांधणीवर खुश होऊन काहीतरी बक्षीस मागण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी शिवरायांकडे मागणी केली. की माझे नाव असणारी पायरी जगदीश्वराच्या प्रवेशद्वारी लावावी व जेव्हा जेव्हा आपण जगदीश्र्वराचे दर्शनास याल तेव्हा आपल्या पायाची पायधूळ या पायरीवर पडावी. एवढंच मागनं त्यांनी मागितलं. यावरून त्यांची त्यागी वृत्ती दिसते.
जगदीश्वर मंदीरीच्या बांधकामात एक वेगळेपण दिसते. ज्यामध्ये त्याच्या कळसाची बांधणी ही मशिदीच्या घुमटाकार अकारा सारखी आहे. यावरून शत्रूला चकवण्यासाठी अशी बांधणी केलेली दिसते.
जगदीश्वर मंदिर प्रवेशद्वार शिलालेख:
जगदीश्वर मंदीरीच्या उजव्या बाजूस एक शिलालेख काळ्या पाषाणात कोरलेला दिसतो. तो शिवकालीन मोडी मराठी लिपीत आहे. त्यावरील अर्थ ( सर्व जगाला आनंद देणारा असा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमंत छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंद नाम संवत्सर चालू असताना शुभ मुहूर्त पाहून हिरोजी इंदळकर नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे, निर्माण करून उभी केली आहेत. ती हे सुर्य चंद्र जोपर्यंत आहेत तोपर्यंत टिकून राहतील.) असे लिहिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज समाधी :
![]() |
रायगड किल्ला ( धर्तीवरच स्वर्ग) Raigad Fort information in marathi |
मंदिराच्या पुर्व दरवाजाने बाहेर आल्यावर लगेच थोड्या अंतरावर एका उंच अशा अष्टकोनी चौकावर आपल्याला समाधी पाहायला मिळते ती आहे छत्रपती शिवराय यांची समाधी. शिवरायांच कैलासगमन झाल्यावर याच परिसरात त्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. इथेच या समाधी मध्ये त्यांची रक्षा व अस्थी विसावली आहेत. तिथे गेल्यावर मन अस्वस्थ व दुःखी होत. एक क्षणभर तिथून हलुही वाटत नाही. एक सारखी शिवरायांची प्रतिमा डोळ्यासमोर दिसू लागते. व अश्रू ओघळतात.
तिथून पुढे थोड्या अंतरावर दारूचे कोठार होते. आता त्याचे अवशेष पहायला मिळतात. तसेच जवळच आपल्याला शिबंदी मध्ये असणाऱ्या मावळ्यांना राहण्यासाठी बांधलेल्या कोठ्यांचे अवशेष ही पाहायला मिळतात.
• मीत्रहो आपण एकदा तरी हा किल्ला सर करावा. व शिवरायांचा पराक्रम आठवावा. ज्यामुळे एक प्रेरणा तुमच्यात निर्माण होईल.
ll छत्रपती शिवरायांचे आठवावे रूप, आठवावा प्रताप, या भूमंडळाचे ठायी.ll