शिवनेरी किल्ला माहिती
Shivaneri Fort information in marathi
![]() |
शिवनेरी किल्ला माहिती Shiveneri Fort information in marathi |
'पहिल्या दिवशी राजदरबारी जन्माला आला शीले शेलेदारी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जोबाळा जो जो रे जो.'
असा प्रसिद्ध पाळणा महाराष्ट्रात म्हंटला जातो. त्या राजांची म्हणजे छत्रपती शिवरायांची पवित्र जन्मभूमी म्हणजे शिवनेरी किल्ला.
शिवनेरी किल्ला स्थान :
महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात असणाऱ्या जुन्नर शहराजवळ उंच अशा सह्याद्रीच्या रांगेत अत्यंत जुन्या नाणेघाट या व्यापारी मार्गावर रखवाली करणारा राखणदार म्हणजे शिवनेरी किल्ला होय. शिवनेरी किल्ला बाजूंनी उंच कात्याळाने बनलेला आहे.
स्थापना :
इसवी सन ११७०.
उंची : ३५०० फूट उंची या किल्याची समुद्र सपाटी पासून आहे.
९०० फूट उंची पायथ्यापासून आहे.
शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी वाहतूक मार्ग :
• मुंबई हून येताना माळशेज घाटमार्ग पुढे आल्यावर एक गणेश खिंडीकडे जाणारा रस्ता, त्या रस्त्याने पुढे शिवनेरी किल्ल्याकडे जाता येते.
• पुणे शहरातून नारायणगाव मार्गे जुन्नर शहर हे अंतर जवळजवळ १०० किलोमीटरचे पार केल्यावर जुन्नर शहरातील शिवाजी पुतळ्याच्या मागील बाजूने पुढे गेल्यावर आपणास डांबरी सडकेने किल्याच्या पायरी वाटे पर्यंत पोहोचता येते.
• जुन्नर हे शहर जुन्या व्यापारी मार्गावर असल्याने ते प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. या ठिकाणाहून किल्ल्यास जाण्याचे मार्ग दोन आहेत.
पुणे व मुंबई हे जवळचे विमानतळ आहेत. येथे उतरून रोडने या किल्यास जाता येते.
• साखळी वाट :
जुन्नर शहरात असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या मागील बाजूने थोडे पुढे गेल्यावर एका मंदिराजवळून एक पायवाट किल्याच्या भिंतीकडे घेऊन जाते. खोदून तयार केलेल्या पायरींच्या साहाय्याने आपण शिवनेरी गडावर जाऊ शकतो. ही अवघड चढनीची वाट आहे.
सात दरवाज्याची वाट :
जुन्नर शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून एक डांबरी वाट शिवनेरी किल्ल्यावर पायरी मार्गाजवळ जाऊन पोहोचते. तिथून सात दरवाजा मार्गे आपण शिवनेरी किल्ल्यावर पोहोचू शकतो.
शिवनेरी किल्ला माहिती Shivaneri Fort information in marathi
शिवनेरी किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
पायरी मार्ग, महादरवाजा, गणेश दरवाजा, परवानगी दरवाजा, पीर दरवाजा, हत्ती दरवाजा, शिवाई देवी दरवाजा, मेणा दरवाजा, शिवाई देवी मंदिर, शिवजन्मभुमी, अंबारखाना, गंगा यमुना पाणी टाके, बदामी टाके, कडेलोट टोक, कोळी चौथरा, पागा, इदगाह, कमानी मशीद ,लेणी, कमानी टाके इत्यादी.
• शिवनेरी महादरवाजा :
डांबरी सडक संपताच पायरी मार्ग लागतो. त्या मार्गाने वर चढून आल्यावर एक भक्कम असा दरवाजा लागतो. तो आहे महादरवाजा.
• शिवनेरी किल्ला गणेश दरवाजा :
महादरवाजा तून पुढे आल्यावर आपणास आणखी एक भव्य दरवाजा लागतो. त्यावर काही प्राण्यांची शिल्पे कोरलेली दिसतात. ती शरभ म्हणजे सिंहाची शिल्पे होत.
• परवानगी दरवाजा :
![]() |
शिवनेरी किल्ला माहिती Shiveneri Fort information in marathi |
तिसरा दरवाजा परवानगी दरवाजा होय. याची वरील कमान ढासळली आहे. आता फक्त उभी चौकट शिल्लक आहे.
पीर दरवाजा :
पुढे जो दरवाजा लागतो तो आहे पीर दरवाजा. हा अत्यंत भक्कम असा दरवाजा आहे.
हत्ती दरवाजा :
२२५ ते २५० पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला हत्तीच्या सोंडे सारख्या वक्राकार पायरी मार्गाने पूढे गेल्यावर आपणास हत्ती दरवाजा लागतो. अत्यंत भक्कम व सुरेख चौकट असणारा हा दरवाजा याच्या दारावर टोकदार लोखंडी खिळे मारलेले आहेत.
पाण्याची टाकी :
हत्ती दरवाजातून पायरी मार्गाने पुढे एका बाजूला गेल्यावर तिथे खडकात खोदलेली पाण्याची लहान लहान टाकी लागतात.या किल्ल्यावर मोजली असता किमान६० तरी पाण्याची कुंडे आहेत. यावरून हा जलसमृद्ध किल्ला असल्याचे जाणवते.
• घोड्याची पागा/ अश्वशाळा :
हत्ती दरवाजातून पुढे पाण्याच्या टाक्यांच्या बाजूने गेल्यावर एक कात्याळात तयार केलेली घोड्यांची पागा लागते. भींतीतत घोडी बांधण्यासाठी दावणीची छिद्रेही दिसतात.
शिवाई देवी दरवाजा :
हत्ती दरवाजातून पुढे गेल्यावर आपणास दोन वाटा दिसतात एक वाट किल्ल्यावर व दुसरा शिवाई देवी मंदिराकडे तेथून पुढे शिवाई देवी दरवाजा आहे. आपणास शिवाई देवी मंदिराकडे जाताना एक भक्कम दगडी बांधकाम असणारा दरवाजा लागतो तो आहे शिवाई देवी दरवाजा.
लेणी :
शिवाई दरवाजाच्या बाजूने जाणारा मार्ग हा कात्याळात खोदलेल्या लेण्यांकडे घेऊन जातो.
कात्याळात खोदलेल्या गुहा व त्यात काही लेणी पाहायला मिळतात. एका एका खोलीच्या अकाराच्या या गुहा म्हणजे ऐतिहासिक वारसाच आहेत.या गडावरील लेण्यांमध्ये बुद्ध लेणी देखील आहेत. यामधे ५० बुद्ध लेणी, ७८ विहार, ३ चैत्यगृहे असून काही अपूर्ण आहेत. यावरून या व्यापारी मार्गाने बुद्ध धर्माचा प्रसार देखील होत होता. तसेच येथील विहारात वाटसरू तथा धम्मप्रसारक देखील विसावा घेत असत. हे समजते. ही माहिती तत्कालीन शिलालेखातून जाणवते.
शिवाई देवी मंदिर:
शिवाई देवी दरवाजाने आत आल्यावर उंच कड्याला लागूनच एक मंदिर लागते. ते शिवाई देवी मंदिर होय. जिजाबाईंनी शिवाई देवीला नवस केला होता की जर पुत्र झाला तर शिवाई देवीच्या नावावरून नाव ठेवेन. व छत्रपती शिवराय यांचा जन्म झाला व शिवाजी असे नाव ठेवले.
तानाजी मालुसरे उद्यान :
शिवनेरी किल्ला चढतेवेळी आपणास एक उद्यान लागते. ते अलीकडे बनवले गेले असून या ठिकाणी निरनिराळी झाडे पाहायला मिळतात. त्याउद्यानास तानाजी मालुसरे उद्यान असे नाव दिले गेले आहे.
मेणा दरवाजा :
हत्ती दरवाजा नंतर आपल्याला मेणा दरवाजा लागतो.
कुलूप दरवाजा :
एकामागून एक दरवाजे उघडत गेल्यावर आपणास शेवटी बालेकिल्ल्यावर तसेच शिवाई देवी दर्शनास जाता येते. त्याआधी एक असा भक्कम कुलूप दरवाजा जो या किल्याचे शेवटचे कुलूप मानले जाते.
एकामागून एक दरवाजे या किल्यावर वेगवेगळ्या राजवटीच्या काळात बनवले गेले आहेत. शौर्याचे प्रतीक असणारी शरभ शिल्पे इथे प्रत्येक दरवाजावर पाहायला मिळतात.
अंबरखाना :
कुलूप दरवाजातून आतमध्ये गेल्यावर आपणास काही भग्न इमारतीचे अवशेष दिसतात. तिथे जवळच अंबारखाना आहे. या ठिकाणी धान्य साठवले जात असे.
शिवकुंज :
आंबरखाण्यापासून पुढे गेल्यावर आपणास एक पूढे वास्तू लागते ती आहे शिवकुंज, या ठिकाणी जिजामाता व शिवराय यांची मूर्ती पाहायला मिळते. छोटीशी तलवार घेतलेला बाळ शिवबा ,त्यास जिजामाता स्वराज्य निर्मितीची स्वप्ने बाळ शिवबाच्या मनात पेरत आहेत. व बाळ शिवराय तलवारीच्या बळावर हिंदवी स्वराज्य मिळविण असे सांगत आहे. असे वाटते.
• दुसरी शिवनेरी वर येणारी साखळी वाट येथून थोड्या अंतरावर आहे. दगडी पायऱ्या वरून साखळी धरून येथे येता येते.
• कमान मशीद :
शिवकुंजासमोरून पुढे आल्यावर आपणास एक कमानीसारखी विजापूर शैलीतील वास्तू पाहायला मिळते. ती आहे कमान मशीद. या ठिकाणी मुस्लिम नमाज पढत असत.कमानी मशीदीस अर्ध चंद्राकृती कमान आपणास पाहायला मिळते.
कमानी टाके :
कमानी मशिदी जवळ खालील बाजूस एक पाण्याचे टाके आहे. नमाज पडण्यास जाते वेळी या टाक्यातील पाणी घेऊन त्यात हात पाय स्वच्छ करून मशीदीत जात असत.ही एक मुस्लिम समाजाची प्रार्थनेची जागा आहे.
गंगा यमुना टाके :
शिवकुंजासमोर थोड्या अंतरावर जिवंत झरे पाहायला मिळतात. तिथे दोन पाण्याची टाकी आहेत. त्यास गंगा यमुना असे म्हणतात.
स्नानगृह /हमामखाना :
राज घराण्यातील स्त्रियांसाठी एक स्नानगृह तिथे बांधले गेले होते. आधुनिक बाथ टब प्रमाणे बांधकाम या ठिकाणी आढळते. या ठिकाणी स्त्रिया स्नान करत असत.
शिवजन्म भूमी :
![]() |
शिवनेरी किल्ला माहिती Shiveneri Fort information in marathi |
बालेकिल्ल्यावर असणारी दोन मजली ऐतिहासिक वास्तू म्हणजे शिवजन्म भूमी इमारत. शहाजी राजांनी दोन शाह्या व मुघल यांच्या घमासान युध्दावेळी आपली पत्नी जिजाबाई यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी ठेवले. कारण त्या गरोदर होत्या या ठिकाणी छत्रपती शिवराय यांचा जन्म झाला. या वास्तूच्या खालील भागात एक पाळणा आहे. व छत्रपती शिवराय यांचा एक छोटा पुतळा ठेवला आहे. या कोठीचा दरवाजा खूपच सुंदर आहे.
बदामी टाके :
शिवजन्मभूमी इमारती जवळच एक बदामाच्या आकाराचे पाण्याचे टाके आपणास पाहायला मिळते. ते आहे बदामी टाके बदामी टाक्याच्या मधील भागात एक स्तंभ आहे ज्याचा उपयोग टाक्यातील पाण्याची उंची मोजण्यासाठी केला जात असे..
कडेलोट टोक :
बदामी टाक्यापासून एक वाट पुढे कडेलोट टोकाकडे घेऊन जाते. त्याकाळातील गुन्हेगार, एखादा फितूर, हेर व युद्धकैदी यांना शिक्षा करण्याचे ते ठिकाण होते. अत्यंत खडा चढ यावरून एखाद्या व्यक्तीस जर ढकलले तर त्याचा जीव जाणे निश्चित, त्यामुळे ही जागा मृत्युदंड देण्याचे ठिकाणचं होय.
कोळी चौथरा :
शिवकाळाच्या सुरवातीस हा किल्ला कधी निजामशाहीत तर कधी आदिलशाहीत, तर कधी मोघलांच्या ताब्यात होता.
निजामशाही नष्ट झाल्यावर हा किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला. हा किल्ला सत्ता केंद्रापासून दूर असल्याने याचा फायदा इथल्या कोळी बांधवांनी घ्यायचे ठरवले. व त्यांनी या किल्ल्यावर आपला अधिकार प्रस्थापित केला. तेव्हा मोघलांनी मोठ्या फौजेनिशी या किल्ल्यास वेढा दिला. त्यावेळी खेमाजी रघतवान व सरनाईक यांनी नेतृत्व स्वीकारून लढा देण्याचे ठरविले. पण नवख्या कोळी सैन्याने शरणागती लवकर पत्करली. पण शरणागत आल्यावर मोघलांनी किल्ला ताब्यात घेतला. व तेथे असणाऱ्या १५०० महादेव कोळी जातीच्या सैन्यास पकडुन कारागृहात डांबले. व त्यांचे खूप हाल केले. व बालेकिल्ल्यात उंच अशा एका टोकावर त्यांनी त्या सैन्याना एक एक नेऊन शिरच्छेद केला. यावरच मुघल थांबले नाहीत. तर खेमाजी व नाईक अन् त्यांची कुटुंबे मुलेबाळे देखील त्यांनी ठार केली. पूर्णतः निर्वंश केला नंतर त्या प्रदेशातील बारा मावळ भागातील नाईकांची धरपकड करून त्यांनाही ठार करण्यात आले. असे करून आपली जरब त्यांनी बसवण्याचा प्रयत्न केला. त्या १५०० कोळ्यांची शिरे त्या वधस्तंभाजवळ पुरली ते ठिकाण एक चौथरा बांधला तोच हा महादेव कोळी चौथरा होय.
• शिवनेरी किल्याच्या बालेकिल्ल्यावरून वडुज धरणाचे पाणी, चावड, नाणेघाट, जीवधन किल्ला तसेच किल्याच्या आसपासचा सुंदर परिसर दिसून येतो.
शिवनेरी किल्ला व त्या परिसरातील ऐतिहासिक घडामोडी :
• जुन्नर शहर व तेथून जाणारा व्यापारी मार्ग हा अतिप्राचीन व्यापारी मार्ग आहे. त्यामुळे हा परिसर इतिहासबद्दल अतीप्राचीन काळापासून आहे.
• जुन्नर या शहराचे जुने नाव जीर्ण नगर, जुन्नेर जुन्नर असे वेगवेगळ्या काळातील राजवटीत पाहायला मिळते.
• शक राजा नहपान याच्या कळात जुन्नर हे राजधानीचे ठिकाण होते.
• सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शक राजा नहपान याचा पराभव केला. व या परिसरात आपले वर्चस्व स्थापित केले. नाणे घाट हा अत्यंत जुना व्यापारी मार्ग असल्याने या मार्गावर देखरेख करण्यासाठी त्याने काही ठिकाणी गुंफा व लेणी खोदली. तसेच चौकी पहारे ठेवले. व एक रांजन घाटात दगडात कोरून त्यात नाण्याच्या रुपात कर गोळा त्या काळी केला जात असे त्या काळात या शिवनेरी किल्याचे थोडेफार बांधकाम केले गेले.
• सातवाहन घराण्यानंतर या ठिकाणी चालुक्य घराण्याची सत्ता काही काळ होती.
• चालुक्य राजवटी नंतर येथे राष्ट्रकूट घराण्याची राजवट इथे काहीकाळ होती.
• इसवी सनाच्या ११७० सालापासून ते इसवी सन १३०८ या काळात या ठिकाणी यादव घराण्याच्या सत्तेचा अंमल येथे होता. यादवांनी व्यापारी मार्गाचे महत्त्व ओळखून या ठिकाणी किल्ला बांधायचे ठरवले. व शिवनेरी किल्याचे बांधकाम केले. यादवांनी या परिसरातील कोळी जातीच्या लोकांची नेमणूक येथे केली.
• बहामनी राजवट स्थापन झाल्यावर हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी मलिक उल तुजार याने इसवी सन १४४३ मध्ये आक्रमण केले. व येथील कोळी सरदाराचा पराभव करून त्याने हा किल्ला बहमनी राजवटीखाली आणला.
• १४४६ साली मलिक महंमदच्या वडिलांचा मृत्यू झाला. व बहामनी सत्तेचे पाच शाह्यांमध्ये रुपांतर झाले. तेव्हा मलिक महंमद याने शिवनेरी किल्ल्यावर इसवी सन १४७० साली निजामशाही स्थापन केली.
• इसवी सन १४९६ साली निजामशाहीत राजधानी अहमदनगरला नेली गेली.
• इसवी सन १५६५ साली निजामाने आपला भाऊ कासिम यास कैद केले. व बंदी म्हणून शिवनेरी किल्यात ठेवले.
• इसवी सन१५९५ साली मालोजीराजे भोसले यांनी निजामशाहीसाठी मोघलांच्या विरोधात पराक्रम गाजवला म्हणून त्यांना शिवनेरी किल्ला व जुन्नर विभागाचा कारभार त्यांच्या ताब्यात दिला.
• इसवी सन १६२९ साली निजामशाही वाचवताना मोघल व आदिलशाहीशी लढताना एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्यावर जावे लागे. जिजाबाई तेव्हा गरोदर होत्या. त्यांच्या सुरक्षेसाठी शहाजीराजे भोसले यांनी विजयराज या किल्लेदाराच्या देखरेखीखाली शिवनेरी वर त्यांना ठेवण्यात आले.
• फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ साली, ग्रेगेरियन कालगणने प्रमाणे १९ फेब्रुवारी १६३० साली शुक्रवारी सूर्य मावळल्यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवराय यांचा जन्म शिवनेरीवर झाला. व स्वराज्याचा सुर्योदय झाला.
• इसवी सन १६३२ साली सिधोजी या किल्लेदाराच्या कन्येशी शहाजीराजे यांचे थोरले सुपुत्र संभाजी यांचा विवाह झाला. संभाजीने पराक्रम करून जुन्नर परिसरात निजामशाही विरुध्द चालून आलेल्या मोगलांशी लढताना पराक्रम गाजवल. त्यावेळी मुघल सैन्याने जुन्नर जिंकले मात्र त्यांना शिवनेरी जिंकता आली नाही. शिवनेरी किल्ला निजामशाहीत राहिला.
• १६३६ साली निजामशाहीचा शेवट अंतर्गत यादवी मुळे झाला. व निजामशाही प्रदेश मोघल व आदिलशहाने वाटून घेतला. यामधे शिवनेरी किल्ला मोघलांच्या ताब्यात आला. पण हा किल्ला मोघल सत्ताकेंद्रापासून दूर असल्याने येथील महादेव कोळी जमातीच्या शिपायांनी बंड केले व आपण स्वतंत्र आहोत असे जाहीर केले. त्यांनी आपल्यातील खेमाजी रघतवान यास आपला नेता नेमले. बारा मावळातील नाईकांनी त्यास पाठिंबा दिला.
• इसवी सन १६५० साली मोघल बादशहाने मोठी फौज पाठवून शिवनेरी किल्यास वेढा घातला. किल्ला जिंकून तेथे मोठ्या प्रमाणात महादेव कोळी लोकांचा नरसंहार केला गेला.
• शिवरायांच्या काळात हा किल्ला स्वराज्यात आणण्याचा प्रयत्न मोरोपंत पिंगळे यांनी केला परंतु यात त्यांना यश आले नाही.
• इसवी सन१६७८ साली शिवरायांनी जुन्नर प्रांत लुटून शिवनेरी जिंकण्याचा प्रयत्न केला. पण घेऊ शकले नाहीत.
• इसवी सन१७१६ साली छत्रपती शाहू महाराज यांनी ही शिवजन्मभूमी जिंकून स्वराज्यात आणली. हा किल्ला पुढे पेशव्यांच्या ताब्यात दिला गेला.
• पेशवे याठिकाणी युद्धकैदी ठेवण्यास वापरू लागले. इसवी सन १७५५ साली पेशवे यांच्या विरुद्ध तुळाजी आंग्रे युद्ध झाले. तेव्हा तुळाजी आंग्रे यांना कैद करून या ठिकाणी ठेवले गेले. तेव्हा येथील कोळी जमातीच्या सैन्यानी तुळाजी आंग्रे यांस पळून जाण्यास मदत केली. तेव्हा नानासाहेब पेशव्यांनी कोळी लोकांना दिलेली जहागिरी, नोकर्या व वतने रद्द केली. त्यामुळे कोळी लोक दुखावले गेले. अन् पुढे त्यांनी पेशव्या विरुध्द बंड केले.
• इसवी सन१७६४ साली माधवराव पेशवे यांनी प्रशासनात बदल करताना कोळी लोकांच्या काही अधिकाराच्या जागा व हक्क यांवर गदा आणली. त्याविरुद्ध कोळी लोकांनी बंड शिवनेरीवर केले. ते मोडण्याचा प्रयत्न केला गेला.
• इसवी सन१७६५ साली दुसऱ्यांदा कोळी लोकांनी बंड केले. ते मोडण्याचा प्रयत्न केला. कोळ्याना कामावरून काढून टाकले. शेवटी इसवी सन १७७१ साली नाना फडणीस यांनी कोळ्यांचे महत्त्व जाणून त्यांशी तह केला. व कोळी लोकांना या ठिकाणी सेवेत रुजू केले.
• पेशवे काळात शिवनेरी किल्याचा वापर कैदी ठेवण्यासाठी केला जात असे. एखाद्या आनंदाच्या प्रसंगी कैदी सोडून दिले जात असत. उदा. सवाई माधवराव पेशवे यांच्या जन्मावेळी १८ एप्रिल १७७४ साली कैद्यांना कारागृहातून मुक्त केले होते.
• इसवी सन १० मे १८१८ रोजी इंग्रज मराठा युद्धानंतर मेजर एलड्रीजन याने शिवनेरी किल्ला जिंकून घेतला.
• इसवी सन१९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा किल्ला स्वतंत्र भारतातील एक भाग आहे.
• शिवनेरी हा किल्ला आता भारत सरकारने महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
शिवनेरी किल्ला माहिती
Shiveneri Fort information in marathi